Yashomati Thakur and Anil Bonde
Yashomati Thakur and Anil Bonde Sarkarnama
विदर्भ

यशोमती ठाकुरांना मास्टरमाइंड म्हणणे भोवले, भाजप नेते बोंडेंवर गुन्हा दाखल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे रविवारी रात्री दुल्ला प्रवेशद्वारावर झेंडा लावल्यावरून वाद झाला. त्यानंतर तेथे दंगल पेटली. दरम्यान भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात बोंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचलपूर-परतवाडा येथे दंगल उसळण्यानंतर अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या घटनेमागच्या मास्टरमाइंड आहेत, असा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात कॉंग्रेसचे (Congress) प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी काल मंगळवारी दुपारी शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून बोंडे यांच्या विरोधात भादंवि कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रक्षोभक विधाने करून हा दंगल घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात उपरोक्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गाडगेनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले.

डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाची बदनामी केली आहे. समाजात, धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अतिशय गंभीर असून समाजविघातक आहे. त्यामुळे डॉ. बोंडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, असे हरिभाऊ मोहोड यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

संचारबंदी लागू..

घटनेनंतर पोलिस प्रशासनाने अचलपूर आणि परतवाड्यामध्ये संचारबंदी लागू केली. आज तिसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू आहे. पण नागरिकांना सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता देण्यात येत आहे. घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. उद्यापासून संचारबंदीमध्ये आणखी शिथिलता वाढविण्यात येणार असल्याची शक्यता पोलिस प्रशासनाने वर्तविली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा अठरावा गुन्हा..

अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमरावती जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. अवैद्य धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्याऐवजी भाजपची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे. या अगोदर माझ्यावर सतरा गुन्हे दाखल असून हा अठरावा गुन्हा दाखल झाला आहे, असे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT