rahul gandhi finds solution on punjab congress feud
rahul gandhi finds solution on punjab congress feud Sarkarnama
मुख्य बातम्या

कॅप्टन नाही अन् सिद्धूही नाही! राहुल गांधींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. चन्नी यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चन्नी यांची निवड करुन एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर त्यांचा हा उपाय जालीम ठरणार आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. माजी मुख्यमंत्री अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला होता. यातून मार्ग काढण्यासाठी सिद्धू यांनी बळ देण्याची खेळी राहुल गांधींनी खेळली. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यानंतर सिद्धूंच्या मागे काँग्रेस नेते एकवटू लागले आणि अमरिंदरसिंग यांची ताकद कमी होऊ लागली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदी कोण येणार, अशी चर्चा सुरू झाली. यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली. राहुल गांधी यांनी मात्र, अमरिंदरसिंग आणि सिद्धू या दोन गटात विभागलेल्या काँग्रेसला एकत्र आणण्याची संधी साधत चन्नी या दलित आमदारावर विश्वास टाकला. यामुळे सिद्धू यांना मिळालेले बळही कमी करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी आज चंडीगडमध्ये सुरू आहे. चरणजितसिंग चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच रंधावा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते.आमदारांच्या बैठकीतही त्यांच्याच नावावर एकमत झाल्याची चर्चा होती. त्यामुळं रंधावा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दीही जमली होती. काही नेतेही त्यांच्या घरी दाखल झाले होते. परंतु, ऐनवेळी चन्नी यांचे नाव जाहीर करुन पक्षाने सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाली होती. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT