Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Thane Politics : महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर गद्दारांना गाडा; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Pankaj Rodekar

Jitendra Awhad Thane News :

राज्यातील पोलिस आता हतबल झालेत. पोलिसी कारभारात आता राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. आणि ज्याला 1945 मध्ये पोलिस स्टेट म्हणायचे, त्यासारखे हे महाराष्ट्र राज्य गुंडांच्या हातात जात आहे आणि पोलिस निष्प्रभ ठरत आहेत. ज्यांच्या मागे राजाश्रय असतो तो जिवंत राहतो, बाकीचे सर्व मारले जातात. त्याला पोलिस स्टेट म्हणतात. या पोलिस स्टेटची निर्मिती आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. याचा मी निषेध करतो, लोकशाही मारली जात असताना मी आनंदोत्सव साजरा करू शकत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, गजानन चौधरी, श्रीकांत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जायचे. आता महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जनता जोपर्यंत उद्रेक करत नाही, तोपर्यंत हे घटनाबाह्य सरकार असेच चालू राहील, असेही ते म्हणाले. राजकारणी राजकारण करतच राहतील, पण जनतेने काय करायचं आहे ? याचा विचार जनतेने करायला हवा. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आहे, हा महाराष्ट्र एस. एम. जोशी यांच्या विचारांचा आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगणारा आहे. या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर ती तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही लाजिरवाणी अशी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेवटी मतदार निवडून देत असतात. त्या मतदारांना निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्र हातात राहू द्यायचा की, महाराष्ट्राची अशी अधोगती चालू ठेवायची. जर तुम्हाला ती थांबवायची असेल तर तुम्हाला दोनच पर्याय आहेत. एकतर निष्ठावानसारख्या माणसाच्या मागे उभे राहा, नाहीतर गद्दारांना मतदान करा. तुम्हाला महाराष्ट्रात सूर्याजी पिसाळांची अवलादी हव्या आहेत की या महाराष्ट्रात शिवा काशीद हवेत. ज्यांनी छातीचा कोट करून महाराजांचा जीव वाचवला होता तसे शिवा काशीद हवेत, निर्णय तुमचा आहे, असे आवाहन आव्हाडांनी केले.

महाराष्ट्राच्या मातीचा स्पर्श माझ्या कपाळाला झाला आहे. त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो की मतदान विचार करून करा. महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर गद्दारांना गाडून टाका. काल अभिषेक घोसाळकर होता, आज निखिल वागळे आहे. उद्या मी असेन, नरेश मणेरा असेन, असेही शेवटी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT