Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
मुंबई

दानवेंची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा; एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी रेल्वेने (Railway) मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज (ता. २९ एप्रिल) मुंबईत केली. (AC local ticket price reduction in 50 percent : Raosaheb Danve)

भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे उद्‌घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना दानवे यांनी वरील माहिती दिली. मुंबईत एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली हेाती. मात्र, त्याचा तिकिटदर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणार नव्हता, त्यामुळे लोकलच्या प्रवाशांकडून एसी लोकलच्या तिकिटदरात कपात करण्याची मागणी हेात होती. त्याची घोषणा आज दानवे यांनी केली.

ते म्हणाले की, मुंबईमध्ये दोन प्रकारच्या रेल्वे चालतात. त्यामध्ये एसी आणि नॉन एसीचा समावेश आहे. नॉन एसीमध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लास असा प्रकार आहे. एसी लोकलमध्ये कुठल्या प्रकारचा क्लास नाही. आम्ही मुंबईत वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र, त्याचे भाडे जास्त आहे. ही जनभावना होती, सामान्य लोकांचा आवाज होता. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आम्ही लोकल ट्रेनमधून प्रवास केला. आम्हाला प्रवासात आलेला अनुभव आणि प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे बोर्डात तिकिटदराबाबत चर्चा केली. लोकल एसीचे जे दररोजचे भाडे होते, त्यामध्ये पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय झाला. त्याबाबतची घोषणा आज झाली आहे. लवकरच रेल्वे बोर्डात जाऊन याबाबतची जी कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून लवकरात लवकर याची अमंलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत केली.

मुंबईतील प्रवशांकडून नॉन एसी आणि एसीच्या तिकिट दरात मोठी तफावत आहे, अशी तक्रार प्रवाशांकडून होत होती. त्यांच्या तक्रारींची दखल घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. ‘एमआरव्हीसी’ ही केंद्र आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली कंपनी आहे. त्यामध्ये राज्य सरकारची बरोबरीची भागिदारी आहे. या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. यामधील ७५० कोटी रुपयांचा हिस्सा राज्य सरकारने अजून दिलेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी राज्य सरकारने आपला हिस्सा देऊन एमआरव्हीसीला मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT