Cm Eknath Shinde-Aditya Thackeray  News
Cm Eknath Shinde-Aditya Thackeray News Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका : गद्दार हे गद्दार म्हणूनच फिरतील

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यातील शिवसेनेत फुट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर 40 आमदार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, 40 आमदारांच्या मनात जो राग-द्वेष दिसतो, तो नक्की कशामुळे आहे. त्यांना पक्ष प्रमुख व पक्षाने जे काही दिले आहे. ते सर्व देऊन देखील आम्ही अशी काय चूक केली की ज्यामुळे यांनी पाठीत खंजीर खुपसला. जी काही सत्ता आली ती त्यांना प्रथम मिळाली. फंड, निधी प्रथम मिळाला. मग चूक आम्ही काय केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हे गद्दार म्हणूनच फिरतील. नुसती गद्दारी झाली नाही तर एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्या मनात कुठेही राग नाही. दुःख याच गोष्टीचे आहे की, उद्धव ठाकरे यांच्यावर कठीण काळ आला होता. त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. तरीही पाठीत खंजीर खुपसला. ही वृत्ती चुकीची आहे. राजकारणात आपण पाहत असतो की सोयीनुसार लोक पक्ष बदलतात. नवीन मार्ग निवडतात. त्याबद्दल काही म्हणणे नसते. उद्धव ठाकरेच्या कठीण काळातच गद्दारी झाली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सर्वकाही ज्या माणसाने दिले, राजकीय ओळख दिली. त्यांच्याशी गद्दारी करणे तरी देखील खोटे बोलणे. आमदारकीचा राजीनामा देण्याची हिंमत न ठेवणे. याला गद्दार नाही तर आणखी काय म्हणायचे. ते 40 लोक गद्दार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्रात दोन जणांचे जम्बो कॅबिनेट आहे. कायद्या प्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे. हे गद्दारांचे सरकार आहे. हे धुक्यावर, राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आलेले सरकार आहे. हे सरकार कोसळणार. मध्यावधी निवडणुका राज्यात लागतील. बेकायदेशीर व घटनाबाह्य सरकारला तीन आठवडे होऊनही मंत्रिमंडळ तयार करता आले नाही. या सरकारने मंत्रिमंडळ करू नये कारण हे सरकारच बेकायदेशीर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

40 लोकांना तिकडे रहायचे असेल तर आनंदात रहावे. पण राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे यावे. ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

मागील अडीच वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला जेवढे महत्त्व दिले. तेवढे महत्त्व पूर्वी व आताही कोणी दिले नाही. सध्याच्या सरकारचा मुंबई विरोधी पहिला निर्णय आरे वरून होता. असे अनेक निर्णय घेतले जात आहेत. मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईवर खरे प्रेम करणारे उद्धव ठाकरे हेच आहेत. ही गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राचा सर्वांगिण व शाश्वत विकास झाला असता. मुंबई, ठाणे, ग्रामीण भाग अगदी अक्कलकुवा पर्यंत कुणालाही गद्दारी पटलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT