Ajit Pawar, Sanjay Gaikwad
Ajit Pawar, Sanjay Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Sanjay Gaikwad: अजित पवारांनी घेतला संजय गायकवाडांचा समचार; म्हणाले पाचही बोटे सारखी नसतात पण...

सरकारनामा ब्युरो

MLA Sanjay Gaikwad : राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे राज्यातील विविध शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. आवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे शासनाकडून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले की, "राज्यातील ९५ टक्के कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे." यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांनी आमदार गायकवाड यांचा निषेध केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने असे वक्तव्य केल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार गायकवाड यांच्यासह राज्य सरकारला सुनावले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांअभावी झालेल्या स्थितीचा आढावा सांगितला. पवार म्हणाले, "राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेली उभी पिके गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना लवकर मदत मिळणे अपेक्षीत आहे."

पवार यांनी गायकवाड यांच्या वक्त्यव्यावरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले. पवार म्हणाले, "अधिवेशनाकडे जनतेचे लक्ष असते. आपल्या प्रश्नांची दखल घेतली जाते की नाही, याबाबत ते लक्ष देतात. अधिवेशनाचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तोडगा निघाला नाही. त्यातच राज्य सरकारच्या आमदारांकडून असंवेदनशील वक्तव्य केली जातात, हे बरोबर नाही."

राज्यात जनतेचे प्रश्न सुटलेले नसताना सत्ताधारी पक्षाने सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे असा सल्लाही पवार यांनी दिला. ते म्हणाले, "सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के कर्मचाऱ्यांकडे हारामीची कमाई असल्याचे वक्तव्य चुकीचे आहे. पाची बोटे सारखी नसतात, पण सर्वांनाच एका तराजूत तोलणे बरोबर नसते. सध्या राज्यावर अनेक संकटे आली असताना कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे महत्त्वाचे असते. मात्र कर्मचाऱ्यांना नाउमेद करण्याचे काम संजय गायकवाड यांनी केले. सत्ताधारीच असे करीत असतील तर राज्य कसे चालणार? शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार? पंचनामे कसे होणार?"

पवार यांनी विदर्भातील (Vidarbh) शाळा पालक चालवत असल्याची माहितीही यावेळी दिली. तसेच सरकारला वठणीवर आणण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही पवारांनी केली. पावर यांनी सांगितले की, "विदर्भातील एका गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक एकत्र आले. कर्मचारी नसल्याने शाळा बंद पडल्या तर आपण आपली शाळा चालवायची, असा निर्णय त्यांनी घेतला. आपण शिक्षकांना पगार देतो, संपकाळात पालक आणि गावकरी शाळा चालवणार का? पेपर तपासायला कुणी नाहीत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार वठणीवर येण्यासाठी काही निर्णय घेण्याची गरज आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT