Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

मी कुणाच्या बापाला घाबरत नाही! अमृता फडणवीसांनी ठणकावलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सोशल मीडियातून टीकेचे बाण सोडत असतात. त्यांच्या ट्विटवर अनेक जण त्यांना ट्रोलही करतात. पण त्याला न जुमानता त्या आपलं मत मांडत राहतात. 'ट्रोलिंगमुळे स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही ट्रोल करत रहा,' असं आव्हान देत त्यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दांत ट्रोलर्सना ठणकावलं.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) हे दोघेही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंगवर मोकळेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली. मागील सात-आठ वर्षांत अमृता फडणवीस यांनी अनेक ट्विट केले. पण त्यांना काही ट्विट डिलिट कराव्या लागल्या होत्या. त्यावर खुलासा करताना त्यांनी सांगितलं की, मी ज्या एक-दोन ट्विट डिलिट केल्या त्या देवेंद्रजींच्या म्हणण्यावर डिलिट केल्या. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.

सोशल मीडियात माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मामू आणि तुम्हाला मामी म्हणून अनेकदा उल्लेख केला जातो. याकडे कसं पाहता, या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या, मला मजाच वाटते. कधी जीवनात निराशा वाटले की ट्रोल पाहून घ्यायचे, मीम्स पाहायचे. ट्रोलिंगमुळे स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी स्वतचे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही ट्रोल करत रहा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

फडणवीस म्हणाले, मी ट्रोलिंग पाहतो, तेव्हा मला दुख होते. पण अमृता घाबरत नाही. तिची सगळी मतं मला पटत नाहीत. माझी अपेक्षा असते, तिनं राजकीय ट्विट करू नये. पण तिचं मतं तिची आहेत. तिला जे वाटतं ते ट्विट ती करते. त्याचं कधीकधी खुप ट्रोलिंग तिला सहन करावं लागतं. मला तेव्हा दु:ख होतं की, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, घाणरडे फोटो, त्यावर मॉर्फ करून अतिशय बीभत्स ट्विट करतात. त्यावेळी वाटतं, कुठं चाललोय आपण, कुठली संस्कृती आहे. मी अमृताला अनेकदा सांगतो की, व्यक्त व्हायचं असेल तर अशा गोष्टींचा सराव असायला हवा.

राजकारणाबाबत ज्ञान नव्हतं

'न बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात पडले होते. ते बाहेरच बोलतात. लग्नानंतर बोलती बंद झाली.' त्यावर फडणवीसांनीही लगेच 99 टक्के पती असे असतात, त्यांची बोलती बंद असते. एक टक्के असतात, त्यांना वेगळं व्हावं लागतं, असा पलटवार केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील, असं बिल्कुल वाटलं नव्हतं. कारण राजकारणाबाबत लग्नाआधी काहीच ज्ञान नव्हतं, असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

माणूस चांगला आहे. मला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. माझ्या आईचं घर बाजूलाच आहे, या गोष्टी लक्षात ठेवून लग्न केलं होतं. आमच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे का, हे माहिती नव्हतं. लग्नानंतर मतदान कार्ड बनवलं, अशी कबुलीही त्यांनी दिली. ही चांगली गोष्ट नाही, तुम्ही राजकीयदृष्ट्या सजग असायला हवे. ही आपली जबाबदारी आहे. पण आम्ही तसे होतो. हे सांगताना मला वाईटही वाटतंय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT