Sushilkumar shinde
Sushilkumar shinde Sarkarnama
मुंबई

जाती धर्माचे राजकारण करून ऐतिहासिक कालखंडात जाणार आहोत का?

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात व देशात सध्या भोंगे, हनुमान चालिसा, बुलडोजर, अमोल मिटकरी, राज ठाकरेंची भाषणे यावर वादंग सुरू आहे. या वादंगावर देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde ) यांनी आपले मत व्यक्त केले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत प्रसंगी त्यांनी हे विचार व्यक्त केले. ( Are we going to go into historical period by politicizing caste and religion? )

काँग्रेसच्या जी 23 नेत्यांच्या बैठकीत ते गेले नव्हते. यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, राज्यपाल म्हणून 13 महिने काम केल्यावर अचानक केंद्रात मंत्रीपद मिळणे ही दुर्मिळ गोष्ट होती. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, लोकसभेचा सभापती झालो. ही काही साधी गोष्ट नव्हती. ही संधी मला सोनिया गांधी व काँग्रेस पक्षामुळे मिळाली. पंतप्रधानाच्या खालोखाल असलेले गृहमंत्रीपद मिळाल्यामुळे जी 23 सारख्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला मी गेलो नाही. मला काँग्रेसने बरेच दिले मग मी त्यांच्या विरोधात जाण्याचे काही कारण नाही.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये काय चुकले व काय चुकतेय याचे विश्लेषण करायला हवे. नेतृत्त्व बदल करा म्हणतात मात्र नेतृत्त्व बदल करून पाहिला तर ज्यांना विधानसभा व विधान परिषदेचे नेते बनविले तेच पाच वर्षांत भाजप गेले. देशात गांधी कुटुंबा विषयी मनात वेड आहे. विशेषतः गरीब माणसाच्या मनात काँग्रेसचे वेड आहे. ते इंदिरा गांधींपासूनचे प्रेम आहे. काँग्रेसमधून गेलेल्या व स्वतःचा प्रादेशिक पक्ष निर्माण केलेल्यांना पुन्हा अपिल केले पाहिजे की, पुन्हा एकत्रित येऊन काँग्रेस मजबूत करा. कारण काँग्रेसला अनेक वेळा पराभव आला. दरवेळी काँग्रेस गेली आहे असे म्हंटले जायचे मात्र काँग्रेसचे राज्य यायचे.

काँग्रेसवर मुस्लिमांचे लाड केल्याचा आरोप होतो. यावर ते म्हणाले, काँग्रेसचा पाया हा गरीब माणूस, सर्वधर्मसमभाव आहे. या गोष्टींना पुढे घेऊन आपण पुढे निघालो तर परिस्थिती सुधारेल. काँग्रेसने कधीही एका समाजाचे लाड केलेले नाही. त्याला फाळणीपूर्वीचा इतिहास आहे. काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहेत. त्यामुळे फाळणी अगोदरही तिच परिस्थिती होती. महात्मा गांधींना त्यासाठीच आपले जीवदान द्यावे लागले. मात्र काँग्रेसने कधी तत्त्वे सोडली नाहीत. त्यामुळे काही झाले तरी काँग्रेस सोडू नये या मताचा मी आहे.

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वा विषयी त्यांनी सांगितले की, असे प्रसंग येतात त्यावेळी स्वरूप पाहण्याची वृत्ती असली पाहिजे. या प्रक्रियेत आमची कुठे तरी चूक होते आहे. ते बरोबर करण्याचे काम झाले पाहिजे.

अनेक पक्षांच्या एकत्रित सरकारांत मी होतो. त्याच्या अनुभवानुसार प्रत्येक पक्षाला समान न्याय दिला पाहिजे. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात. काँग्रेसला सध्या महाविकास आघाडीत न्याय मिळत आहे. महाविकास आघाडीत साध्या अनुभवी व अनअनुभवी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ते एकमेकांना जुळवून घेत आहेत.

राज्यात सुरू असलेल्या वादांवर त्यांनी सांगितले की, मी या सर्वांपासून दूर आहे याचे मला फार बरे वाटते. कारण मी सर्वधर्मसमभाववाला आहे. जाती, धर्माच्या विरूद्ध हा देश कधीही चालू शकणार नाही असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आता जे धर्म व जाती विरुद्ध चालले आहे; त्याच्यावर मी खूप नाराज आहे. माणूसकी विरुद्ध हे चालले आहे. जनतेने मताचा अधिकार वापरून त्यांना वठणीवर आणावे. घटना व संविधानाप्रमाणे आपला देश कुठे घेऊन जायचा याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही. जाती धर्माचे राजकारण करून आपण ऐतिहासिक कालखंडात जाणार आहोत का, असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.

सुशीलकुमार शिंदेंनी राजकारणापासून दूर रहावे

सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही राजकारणात पक्ष श्रेष्ठींना विरोध केला नाही. ती त्यांची प्रवृत्ती नाही. प्रणिती शिंदेही तीन वेळा निवडून आल्या मात्र त्यांनीही मंत्रीपदासाठी हट्ट धरला नाही. जे मिळाले त्यात समाधानी राहण्याची त्यांची वृत्ती आहे. सुशीलकुमार शिंदे अनेक वर्षांपासून राजकारणात असल्यामुळे त्यांची कामे करण्याची वृत्ती आहे. मात्र आता त्यांनी राजकारणापासून दूर रहावे. सामाजिक क्षेत्रात वावरावे. पुस्तक प्रकाशनांत जावे. त्यांचे वय आता 80 झाले आहे. राजकारणात असल्यामुळे अजूनही त्यांना घराकडे लक्ष द्यायला जमत नाही. मंत्री पदासाठी प्रणिती व आम्ही आग्रही नाही. तिला काँग्रेस पक्षाने अनेक पदे दिली आहेत, असे सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT