Sudhir Mungantiwar-Aryan khan
Sudhir Mungantiwar-Aryan khan Sarkarnama
मुंबई

आर्यन खान ड्रग्जप्रकरण आंतरराष्ट्रीय कटाचा तर भाग नाही ना? : मुनगंटीवारांनी व्यक्त केली भीती

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्जप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत नवनवीन प्रकरणे बाहेर काढत आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सातत्याने पत्रकार परिषदा होत आहेत, हा आंतरराष्ट्रीय कटाचा तर भाग नाही ना? याचाही विचार व्हावा, असा संशय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. (Aryan Khan drug case is not part of the international conspiracy, is it? : Mungantiwar)

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रविवारी (ता. ७ नोव्हेंबर) दिल्लीत झाली. त्यानंतर राज्याचे माजी अर्थमंत्री मुनगंटीवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, राजकारणात आरोप करताना पुरावा सादर करावा लागतो. नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत, तरीही त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यामुळे बिनपुराव्याचे असे आरोप करणे चुकीचे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात चार वर्षांपूर्वी जे आरोप केले गेले आहेत. मग, पुरावे असतील तर ते चार वर्ष गप्प का राहिले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भारताने अमेरिकेपेक्षा दुप्पट लोकांना म्हणजे शंभर कोटी जनतेचे लसीकरण केले आहे. ‘हर घर दस्तक’ योजनेच्या माध्यमातून लसीकरण लोकांपर्यंत पोचविण्यात आले आहे. तसेच, भारतीय लशींना जगात मान्यता मिळाली. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच, गावागावांत केंद्र सरकारच्या योजना पोचाव्यात, याबाबतचे नियोजन करावे, असेही या बैठकीत सूचविण्यात आले आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी कुठल्या कुटुंबापेक्षा देशाचा उदो उदो करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने करावे, असे सांगितलं आहे. विकास आणि जनसेवेने विकृतीच्या राजकारणाला उत्तर द्या, असा संदेशही मोदींनी या बैठकीच्या माध्यमातून दिला आहे. काही राजकीय पक्ष हे विरोधाला विरोध करत आहेत, त्यांचा सामना करण्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पाच राज्याचा आगामी निवडणुकीच्या रणीनीतीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. विकासाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवू आणि विजय मिळवू, असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे, असे सांगून पेट्रोलवरील व्हॅट कमी न करण्याच्या राज्याच्या भूमिकेवरही मुनगंटीवार यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की,एकीकडे लढणारे नेतृत्व आहे, तर दुसरीकडे रडणारे नेतृत्व आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं नाही, त्यामुळे यांना जनतेची चिंता नाही. त्यांनी फक्त तिजोरीची चिंता केली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. त्यांना आता राज्यातील जनताच उत्तर देईल. देगलूरचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना जेव्हा भाजपने पक्षात प्रवेश दिला. तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की, गटारातील पाणी भाजपत गेले की शुद्ध होतं. मग त्यांनी स्वतः शिवसेनेत असलेल्या लोकांना गटार म्हटलं का हा प्रश्न आहे? त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT