Ashish Shelar Latest News
Ashish Shelar Latest News Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar: '' महाराष्ट्राच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती...''; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Ashish Shelar On Mahavikas Aaghadi : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पवार यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलनं देखील केली जात आहे.

याचवेळी अजित पवारांची शिवसेनेचं (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पाठराखण करत थेट भाजपवरच टीका केली होती. आता यावरुनच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार पलटवार केला आहे.

भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटासह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता - जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक "औरंगजेबी" चाल तर नाही ना? असं प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीनचाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलीय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहिलीय? असा सवाल देखील शेलार यांनी केला आहे.

तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती सामनाच्या संपादकपदी प्रभादेवीत बसला आहे. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता ही नवी मांडणी शिवसेनेला मान्य आहे का.? शिवसेनेला वैचारिक लकवा बसला आहे अशी घणाघाती टीका देखील शेलारांनी केली आहे.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे असा इशारा देतानाच संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

सामनातून अजित पवारांची पाठराखण तर शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो.

त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अण्णाजी पंत आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? असा खडा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं सामनातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT