Devendra Fadnavis on Badlapur Minor Student Assault Sarkarnama
मुंबई

Badlapur Rape Case: बदलापूर अत्याचाराची चौकशी SIT करणार; फडणवीसांनी दिले आदेश

Mangesh Mahale

Badlapur News : बदलापूर येथील (Badlapur School Crime) एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून आंदोलकांनी शाळा व पोलिसांवर दगडफेक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे.

पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाची (Badlapur rape case) चौकशी करणार आहे. फडणवीस यांनी एक्सवर ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. आयोगाचे पथक दिल्लीतून बदलापूरकडे रवाना झाले आहे.

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. घटना घडलेल्या शाळेमधील सीसीटीव्ही बंद होते अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.या प्रकरणातील आरोपी अक्षय रामा शिंदे याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ७४, ७५, ७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

१६ ऑगस्ट रोजी दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आली नाही. गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आहे. बदलापूरला आम्ही टीम पाठवणार आहोत, असे आयोगाच्या अध्यक्षा प्रियांक कानूनगो यांनी माध्यमांना सांगितले. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही टीम पाठवणार आहोत. ज्यांनी हलगर्जी केली असेल त्यांच्याविरोधात पॉक्सो कलम १९ खाली FIR दखल केला जाईल. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रियांक कानूनगो यांनी सांगितले.

महिला आयपीएस आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तातडीने जी कारवाई करणे गरजेचे आहे, ती कारवाई सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विरोधीपक्ष संवेदनाहीन

गुन्हा दाखल करण्यात जर दिरंगाई केली असेल, तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. विरोधीपक्षांनी अशा घटनांमध्ये राजकारण करु नये, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे राजकारण करणे चुकीचे आहे. विरोधीपक्ष संवेदनाहीन आहे. केवळ त्यांना राजकारण करायचे आहे. मुलींच्या कुटुंबियांना न्याय कसा देता देईल, याचा विचार सरकार करीत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या घटनेवर राजकीय पोळी भाजू नये, असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT