Bhaskar Jadhav News, Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Bhaskar Jadhav News, Eknath Shinde News, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदमांना एकदा रोखठोक उत्तर द्यावे लागेल

सरकारनामा ब्युरो

चिपळूण ( जि. रत्नागिरी ) - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मंत्री असलेली महाविकास आघाडीची सत्ता गेली. शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता मिळविली. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी भाजप व शिंदे गटावर टीका केली. तसेच शिवसेना व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांना त्यांनी सूचक इशारा दिला आहे. ( Bhaskar Jadhav said, Ramdas Kadam will have to answer once )

भास्कर जाधव म्हणाले, या बाबत मी सविस्तर बोलणार आहेच. मात्र मी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. सर्व परिस्थिती मी नजरेखालून घालतो. कोण कोणत्या संदर्भात आपली मते मांडतोय हे मी पाहतो आहे. परंतु रामदास कदमांना एकदा रोखठोक उत्तर द्यावे लागेल. आणि ते मी योग्यवेळी देणार आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन आलेल्या भाजप व शिंदे सरकार यांनी एक एप्रिलपासून महाराष्ट्र सरकारने लोकहितासाठी घेतलेले निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यासंदर्भातील शासन आदेश पाहताना मला आश्चर्य वाटते. त्या आदेशात म्हंटले आहे की, ग्रामीण भागामधील विकासासाठी मूलभूत गरजा व यात्रा स्थळांचा विकास, कोकण पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास, संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास, जिल्हास्तरीय पंचायतींना थोर व्यक्तींची स्मारके उभारण्यासाठीचे अनुदान आणि राज्यस्तरीय योजनांना दिलेला निधी थांबविण्यात आला आहे.

हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की, भारतीय जनता पक्षाने आपले छुपे अजेंडे राबविण्यासाठी त्यांना हे सरकार हवे आहे. त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित केला. जलयुक्त शिवार योजना ज्यातून काहीही निघाले नाही. ही योजना भ्रष्टाचारात फसलेली होती. ती योजना पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तरी चालेल तर आरे मध्येच कारशेड उभारणार असे काम सुरू आहे. असे भाजपचे त्यांच्या अजेंड्यातील निर्णय घेतले. मात्र राष्ट्रपुरुषांच्या स्मारक विकासाचे, लोकांच्या देवदेवतांच्या मंदिर विकासाचे, ग्रामविकासाच्या कामांना स्थगिती देण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून भाजप आपला अजेंडा राबविणार आहे. यातून भाजपचेच हे सरकार असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत असल्याचे शासन आदेशावरून दिसून येत आहे, असे मत त्यांनी मांडले.

शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. घटनातज्ज्ञांना वाटत होते की, आजच या प्रकरणाचा निकाल लागेल. या देशात लोकशाहीचे कोणी लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार जीवंत आहे आणि राहील. आज यावर निर्णय होऊ शकला नाही. याबद्दल आश्चर्य वाटत नसले तरी लोकशाहीची चिंता वाटते, असे त्यांनी सांगितले.

ज्यांनी भाजप बरोबर जाऊन सरकार स्थापन केले त्यात नऊ जण मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, एक एप्रिल रोजी निर्णय घेतला त्यावेळी सरकारमध्ये तुम्ही होतात. तुम्ही सरकारमध्ये असताना त्या निर्णयाला स्थगिती मिळतेय. याचा अर्थ तुम्ही त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे होते का? नवीन काही योजना आखल्या तर मी समजू शकतो. तुम्ही घेतलेल्याच निर्णयाला स्थगिती देणे याचा अर्थ तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना तुमच्या पाठिंब्याचे महत्त्व राहिलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT