Mohit Kamboj
Mohit Kamboj Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : मोहित कंबोज यांच्या गाडीवर ‘मातोश्री’जवळ शिवसैनिकांचा हल्ला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (Bjp) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर आज (ता. २२ एप्रिल) रात्री सव्वा नऊच्या सुमारास शिवसैनिकांनी हल्ला केला. या कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र, कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, कंबोज हे मातोश्रीची (Matoshri) रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. (Big news : Shiv Sainiks attack Mohit Kamboj's car near Matoshri)

मुंबईत आज राणा दांपत्य विरोध शिवसेना असा हाय व्होल्टेज ड्राम दिवसभर रंगलेला असतानाच रात्री ही घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरण पुन्हा गरम झाले आहे. मोहित कंबोज हे ‘मातोश्री’जवळ येताच शिवसैनिक आक्रमक झाले. कंबोज हे मातोश्रीची रेकी करण्यासाठी आले आहेत, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या ताब्यात एकूण पाच गाड्या होत्या. या हल्ल्यात कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. पण कोणालाही दुखापत झालेली नाही.

मोहित कंबोज यांच्या झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अशा प्रकारचा हल्ला होणे, हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे पोलिसांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करतात, यावरून महाराष्ट्र कुठे चालला आहे, हे दिसून येते. दररोज अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसते.

गेल्या तीन दिवसांपासून ही परिस्थिती वाढली आहे. पोलखोल यात्रेवर दगडफेक करण्यात आली. पोलखोलचे स्टेजची तोडफोड केली जात आहे. आज तर मातोश्रीच्या बाहेर हल्ला होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याच गरज आहे. हे प्रकरण हाताबाहेर गेले. हल्ला होत असताना समोरचे मूग गिळून गप्प बसणार नाहीत. हल्ल्याला प्रतिहल्ले झाले तर स्थिती हाताबाहेर जाईल. गृहखात्याने आणि पोलिसांनी दखल घेण्याची गरज आहे. पोलिस कोणत्या पक्षाचे आणि सरकारचे गुलाम नाहीत. पोलिस जनतेचे सेवक आहेत, त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या कृतींवर तातडीने लगाम लावण्याची आवश्यकता आहे. अन्यथा उद्या काही परिस्थिती बिघडली, उद्रेक झाला तर त्याला सरकार आणि पोलिस जबाबदार असतील, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

दरम्यान, कंबोज यांनी याबाबत सांगितले की, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडून घरी येत असताना माझी गाडी ‘मातोश्री’ परिसरात येत होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. सुदैवाने यात आम्हाला काही दुखापत झाली नाही. पण, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT