Ashish Shelar
Ashish Shelar  Sarkarnama
मुंबई

आशिष शेलार शिवसेनेला पुन्हा जेरीस आणणार; भाजपने दिली महत्वाची जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एकदा जेरीस आणण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आमदार आशिष शेलार यांच्यावर टाकली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा पक्षाने आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर सोपवली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारीही देण्यात आलेली आहे. (BJP give responsibility of Andheri East Assembly by-election to Ashish Shelar)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा भारतीय जनता पक्षाकडून आशिष शेलार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त जागेवर निवडणूक होणार आहे. भाजपकडून या मतदारसंघाच्या तयारीसाठी आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्यातच शेलार यांच्याकडे या पोटनिवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याने राज्यसभेप्रमाणे शेलार या पोटनिवडणुकीची सूत्रे कशी हलवतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाकडून आतापासूनच करण्यात आली आहे. त्यानुसार काही नेत्यांकडे मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही केंद्रीय स्तरावरची जबाबदारी आहे. शेलार यांच्याप्रमाणे राज्यातील काही नेत्यांवर अशी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मी कोकणातला सुपुत्र आहे. गिरणगावात वाढलो आहे, त्यामुळे माझ्याकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, असे शेलार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

दरम्यान विधान परिषद पोटनिवडणुकीबाबत शेलार म्हणाले की, शिवसेनेनं काय तयारी केली, यावर मी बोलणार नाही. मविआचा निकाल राज्यसभेत जसा लागला तसाच विधान परिषदेत लागेल. आमच्यासाठी नरिमन पॉईंट काय पवई काय. सगळीकडे आमचा वावर असतो. भाजप कुणा व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आमचा विजय व्हावा, यासाठी आम्ही निवडणुक लढत आहोत. फक्त कुणा व्यक्तीला पाडायचे आहे यासाठी लढत नाही, असा खुलासा त्यांनी इम्तियाज जलिल यांच्या खडसेंसंदर्भातील दाव्यावर केला.

काँग्रेसने चार दिवस आंदोलन करण्यापेक्षा, जो आरोप राहुल गांधी आणि त्यांच्या परिवारावर झाला आहे, त्याचा अभ्यास करावा. एवढे गंभीर आरोप, एवढा मोठा घोटाळा या सर्वांचे स्पष्टीकरण काँग्रेसने द्यायला हवे. हातसफाई करण्याचे काम कॉग्रेस करत आहेत, असे भाष्य काँग्रेसच्या राजभवनावरील आंदोलनावर शेलार यांनी केले.

एमआयएमची बी टीम शिवसेना आहे. एमआयएमची दोन मते शिवसेनेला गेली आहेत. इम्तियाज जलील तुमच्या पक्षातले हे स्थान बघा. दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्यासाठी तुम्ही नाही आहात. औरंगाबाद निवडणुकीत एमआयएमची बी टीम शिवसेना बनेल आणि मुंबईत एमआयएम शिवसेनेची बी टीम बनेल, असेही शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT