Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीसोबत ठरलं होतं, कारण..! फडणवीसांनी कबुली देत केला आणखी एक गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) 2017 मध्ये युती होणार होती, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकताच केला आहे. त्यावरून महाराष्ट्राचा राजकारणात चर्चांना उधाण आला आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या न झालेल्या युतीची कबुली देत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ही युती का करायची, होती याचं कारण त्यांनी उघड केलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्या दाव्यावर स्पष्टपणे भाष्य केलं. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, 2017 च्या संदर्भात मी म्हटलं की, बीत गई वो बात गई. पण आशिष शेलार यांनी जे सांगितलंय त्यावर एवढंच सांगतो की, 2017 चा प्रयत्न काँग्रेसला एकटं पाडण्यासाठी होता. देशभरात नॉन काँग्रेस एक करण्याचा प्रयत्न चालला होता. त्या प्रयत्नातला तो एक भाग होता. तो बऱ्यापैकी यशस्वीही होत होता. पण त्यावेळी शिवसेना नको, असा एक प्रश्न आला. पण आम्हाला शिवसेना (Shiv Sena) हवी होती. त्यामुळे तो निर्णय होऊ शकला नाही.

राष्ट्रवादीशी युती न झाल्याचे आता प्रायश्चित घेतोय, असं वक्तव्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. 'प्रायश्चित नाही. अगदी शब्दावर जाऊ नये. त्यांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता की, मित्र आहे म्हणून आम्ही शिवसेनेशिवाय युती करणार नाही, हा निर्णय घेतला. त्यांच्यावर जेव्हा वेळ आली त्यावेळी त्यांनी धोका दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

त्यांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणून...

महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधी अजूनही चर्चा होते. याबाबत फडणवीस यांना या कार्यक्रमात विचारले असता फडणवीस म्हणाले, एखाद्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर राजकारणात मरता येत नाही, जिवंत राहावं लागतं. जिवंत राहिले तर तुम्ही बदलाही घेऊ शकता. जिवंत राहिले तर तुम्ही परिस्थितीही बदलू शकता. त्यामुळे त्यावेळी मला योग्य वाटलं, जिवंत राहण्यासाठी यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना असंच उत्तर दिलं पाहिजे. संधी आली आणि ते केलं. त्यानंतर हे स्पष्टपणे सांगितलंही की, हे नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं. हे सांगण्याची हिंमतही माझ्यात आहे. पण त्यावेळेस वाटलं योग्य होतं, ते केलं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

...तर महाराष्ट्र बिघडणारच नाही

सध्याच्या राजकीय स्थिती अत्यंत खालच्या स्तरावर गेली आहे. त्यात बदल व्हायला हवा, यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन तोडगा काढायला हवा का, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राजकारणात प्रत्येकाला असं वाटतं की मी बरोबर आणि समोरचा चूक. सर्वांनी एकत्र येणं, अवघड असतं. पण ही परिस्थिती का आली, हे समाजवून घेतलं पाहिजे. निवडून आलेल्या मोठ्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मित्र जेव्हा ज्यांच्याविरोधात निवडून आले, त्यांच्यासोबत गेले. वसुली हा एकमेव अजेंडा असलेले सरकार सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही स्थिती आली. पण ही स्थिती योग्य नाही. महाराष्ट्राची बेअब्रु होत आहे. अनेक घोटाळे समोर आले. देशातील सर्वोत्तम पोलीस विभागाची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, त्यांचा कुणाशी संवादच नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. तुम्हीही पुढाकार घेऊ शकता. रोज सकाळी तुम्ही माईक पकडून संजय राऊतांकडे गेला नाही, तर महाराष्ट्र बिघडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT