Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

शिवसेनाचा बदला घेणार, पण कसा? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा मी पुन्हा येईन, असा नारा दिला आहे. 'एखाद्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर राजकारणात मरता येत नाही, जिवंत राहावं लागतं. जिवंत राहिले तर तुम्ही बदलाही घेऊ शकता,' असं फडणवीस शिवसेनेला (Shiv Sena) उद्देशून म्हणाले आहेत. राजकारणातील बदला हा 'स्वीट रिव्हेंज' असतो, असं स्पष्ट करत फडणवीसांनी बदला कसा घेणार, हेही सांगितलं.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, एखाद्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर राजकारणात मरता येत नाही, जिवंत राहावं लागतं. जिवंत राहिले तर तुम्ही बदलाही घेऊ शकता. जिवंत राहिले तर तुम्ही परिस्थितीही बदलू शकता. त्यामुळे त्यावेळी मला योग्य वाटलं, जिवंत राहण्यासाठी यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना असंच उत्तर दिलं पाहिजे. संधी आली आणि ते केलं. त्यानंतर हे स्पष्टपणे सांगितलंही की, हे नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं. हे सांगण्याची हिंमतही माझ्यात आहे. पण त्यावेळेस वाटलं योग्य होतं, ते केलं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

त्यावर मग राज्याच्या राजकारणात सध्या बदला घेण्यासाठीच हे सुरू आहे का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यांनी या प्रश्नावर बोलताना गुगली टाकली. 'बदला या शब्दाला पकडून राहण्याचे कारण नाही. राजकारणातील बदला हा 'स्वीट रिव्हेंज' असतो. म्हणजे तिनही पक्षांना पराभूत करून एकट्याच्या जीवावर आम्ही सरकार बनवून दाखवू, हा बदला असेल, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

मी पुन्हा येईन, हे फडणवीसांचे वाक्य 2019 च्या प्रचारात चांगलंच गाजलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपदधर्म आणि शाश्वत धर्म राजकारणात आम्ही जपतोच. कधीकधी राजकारणात तडजोड करावी लागते, तो आपदधर्म. विचारधारेने चालणं हा शाश्वत धर्म. शाश्वत धर्मावरच विश्वास ठेवा, असं आम्ही स्वत:लाच सांगत होतो. मी पुन्हा येईन, हे मी त्यावेळी म्हटलं होतं. जनतेनंच पुन्हा आणलंही होतं. पण त्यावेळी काही लोक खोडा घालू शकतात, हे माहिती नव्हतं. पण हरकत नाही. मी पुन्हा येईन, म्हटलं होतं पण कधी येईन सांगितलं नव्हतं. पण आजही ठामपणे सांगतो, मी पुन्हा नक्की येईन.

काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी...

भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 2017 मध्ये राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP) आणि शिवसेनेची युती होणार होती, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 2017 च्या संदर्भात मी म्हटलं की, बीत गई वो बात गई. पण आशिष शेलार यांनी जे सांगितलंय त्यावर एवढंच सांगतो की, 2017 चा प्रयत्न काँग्रेसला एकटं पाडण्यासाठी होता. देशभरात नॉन काँग्रेस एक करण्याचा प्रयत्न चालला होता. त्या प्रयत्नातला तो एक भाग होता. तो बऱ्यापैकी यशस्वीही होत होता. पण त्यावेळी शिवसेना नको, असा एक प्रश्न आला. पण आम्हाला शिवसेना हवी होती. त्यामुळे तो निर्णय होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT