Devendra Fadnavis, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena UBT : "चिंगम, शकुनी अन् पत्राचाळीचा लुटारू..."; सामना अग्रलेखातील फडणवीसांवरील टीका भाजपच्या जिव्हारी, राऊतांवर हल्लाबोल

Jagdish Patil

Mumbai News, 28 Sep : "ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो," अशा शब्दात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' (Dharmveer 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या चित्रपटच्या आडून फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्याची टीका केली आहे.

अशातच आजच्या सामना अग्रलेखातून 'धर्मवीर-3 या चित्रपटाची पटकथा मी लिहीन' या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत.

मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात (BJP) आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली आहे.

त्यात महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील." अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना डिवचलं आहे.

फडणवीसांवरील हीच टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. दरेकर यांनी एक्सवर ट्विट करत संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं की, "महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसजी यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे.

ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊतांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच.

पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्रजी फडणवीस जी हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका‘च्या सर्टिफिकेटची गरज नाही.", असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT