Shrikant Bharatiya, Uddhav Thackeray
Shrikant Bharatiya, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

कोणी कोणाला पोसलं ; युती तुटल्यानंतर तुमचं काय झालं ; भाजपचा टोमणा

सरकारनामा ब्यूरों

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावरुन भाजपवर हल्लाबोल केला होता. यावरुन आता भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya) यांनी शिवसेनेने युतीपूर्वी लढविलेल्या जागा, युतीनंतर जिंकलेल्या जागा, याबाबत सविस्तर माहिती देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहे.

''बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची अशी लाट आली होती की, तेव्हाच सीमोल्लंघन केलं असतं तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे मुख्यमंत्री ठाकरे रविवारी म्हणाले. पण हे साफ खोटे आहे. बाबरी पडल्यानंतरच्या म्हणजे १९९३मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल १८० जागा लढवल्या होत्या. त्यातील १७९ ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. एका ठिकाणी त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आला होता. १९९६ साली २४ पैकी २३ जागी तर २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी डिपॉझिट जप्त झाले होते. राज्याच्या सीमांचे उल्लंघन करण्यापूर्वी घराच्या सीमांचे उल्लंघन करणे आवश्यक आहे,'' असा टोला श्रीकांत भारतीय यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

''१९६६-१९९० पर्यंत कोण कोणाला पोसतं होते, शिवसेना कुठे होती. १९९०ला युती झाली, भाजपसोबत शिवसेनेची कामगिरी सुरु झाली. तोपर्यंत शिवसेनेला दोन टक्केही मते नव्हती. आम्ही कधी म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला पोसलं आहे. तो आमचा संस्कार नाही. भाजप दुर झाल्यावर काय झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवाडी तपासली तर लक्षात येईल कुणी कोणाला पोसलं,'' असे श्रीकांत भारतीय म्हणाले.

मुख्यमंत्री रविवारी म्हणाले की,शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली की हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. पण हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, असा सवाल यांना पाहिल्यानंतर पडतो. आज यांचे जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी पांघरलेले ढोंग आहे. यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय, हे 25 वर्षे यांना पोसल्यानंतर आपल्या लक्षात आले हे आपले दुर्दैव आहे.

''लोक आपल्यावर टीका करतात की, तुम्ही काय करता आहात. आम्ही हिंदुत्व सोडले असे म्हटले जाते. पण आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. हिंदुत्व सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्रिवार नाही,'' असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं.

''जे काही होईल ते होईल. पण खरं हिंदुत्व काय आहे हे घेऊन आपण पुढे जायचं आहे. हार होईल किंवा जीत होईल, ठीक आहे होऊ द्या. आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हारलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये. आम्ही लढणार. आणि आम्ही बघू बाहेरच्या राज्यांत आम्ही किती दिवस हरू. एक दिवस तोही येईल. जसा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात आलेला आहे. तसा आमच्याही आयुष्यात येईल आणि आम्ही तो आणू. एवढी जिद्द आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिलेली आहे,'' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT