Vidya Chava news
Vidya Chava news facebook/@ncp
मुंबई

याचा हिशोब भाजपला द्यावा लागणार: विद्या चव्हाणांचा इशारा

सरकारनामा ब्युरो

Vidya Chavan critics on BJP

मुंबई : ''भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही धिक्कार करतो. भाजपच्या पुरूष पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांना थप्पड लगावली आहेच, पण ही थप्पड महागाईचा सामना करणाऱ्या राज्यातील तमाम महिला वर्गाला लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावर विद्या चव्हाण यांनी भाजपवर वाढत्या महागाईवरुन सडेतोड शब्दांत फटकारले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आलेल्या असताना त्यांना महागाईबाबतचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे गेल्या होत्या. इंधनाचे वाढलेले दर, गॅसची भाववाढ, अन्नधान्याची महागाई यामुळे गृहिणी अडचणीत असल्याचे या निवेदनात नमूद केले होते. लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांचा विनयभंग करत श्रीमुखात भडकावली.

या घटनेचा निषेध करत असताना विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, महागाईबाबत बोलणे चूक आहे का? एकेकाळी तुम्हीच महागाईवर आकाशपाताळ एक केले होते, मग आज महागाईबाबतचे निवेदन तुम्हाला का नको? भाजपला याचा हिशोब द्यायला लागेल. जर भाजपने माफी मागितली नाही, तर राज्यात प्रत्येक ठिकाणी महागाईवर भाजपला जाब विचारला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली मोठमोठी आश्वासने देऊन, महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली. पण आता महागाई आकाशाला भिडली असताना पंतप्रधान मोदी आणि भाजप गप्प आहे. उलट सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते कुठे आहे महागाई? असा निर्लज्ज प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकार आल्यापासून संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, बेरोजगारी वाढली आहे, रुपयाची किंमत घसरली आहे. अशा वेळी महागाईचे निवेदन देण्यासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना तुम्ही थप्पड मारता, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला आहे.

मग आता जनताच भाजपला थप्पड मारल्याशिवाय राहणार नाही. महागाई जर कमी केली नाही, तर संसदेच्या पुढच्या अधिवेशनात आम्ही थेट दिल्लीतच महागाईबाबत लाटणे मोर्चा काढू, असा इशारा विद्याताई चव्हाण यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT