Chandrakant Patil, Raj Thackeray
Chandrakant Patil, Raj Thackeray sarkarnama
मुंबई

'महाविकास आघाडी सरकर राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदिवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा लावणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यावर आज (ता.३) औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावरुन भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, "हनुमान चालिसा वाचणे राजद्रोह ठरवणारे महाविकास आघाडी सरकार खासदार-आमदार दांपत्यांला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत न्यायालयाने आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळे काय होणार?''

''बेकायदा भोंग्याच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल.'' असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. तर काही कार्याकर्त्यांना अटक केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, मशिदीवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होत. मात्र, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशातल्या राज्य सरकाराना प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध रुग्ण अशक्त व्यक्ती लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्याच्या आवाजामुळे होणान्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे. त्या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की "रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल, असे म्हटले आहे.

ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे. लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी १० डेसिबल आणि जास्तीतजास्त ४५ ते ५५ डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या १० डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि ५५ डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज प्रश्न असा आहे की, सर्व भोगे है अनधिकृत आहेत. भोगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणार असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायला हवी.

मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयाना ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाच देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसती म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे. हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मनिच दिलं जाईल, असा इशाराही राज यांनी दिला आहे. देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT