Chitra Wagh, Supriya Sule
Chitra Wagh, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh News : चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना आवाहन; म्हणाल्या, "राजकिय..."

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh and Supriya Sule : सध्या देशात केरला स्टोरी या चित्रपटावरून रणकंदन सुरू आहे. हा चित्रपटाच्या माध्यमातून केरळातून ३२ हजार महिला बेपत्ता झाल्याच्या दावा करण्यात आला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यातूनही मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यावरुन खासदार सुळे यांच्यावरून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली. तसेच महिलांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक ट्विट करून राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलींबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अनेक प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. खासदार सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का?"

Supriya Sule's Tweet

सुळे यांच्या ट्विटवर भाजपच्या (BJP) वाघ यांनी सडकून टीका केली. वाघ यांनी आकडेवारी देत महाविकास आघाडी सरकारच्या काळातही असे प्रकार घडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाघ म्हणाल्या, महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे. आपण मात्र अशा थाटात हा विषय मांडला जणू सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या. आधी विषय समजून घ्या. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी चार हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात.

महाविकास आघाडीचे (MVA) सरकार असताना कोविड काळातील मुली व महिला बेपत्ता झालेची माहिती वाघ यांनी यावेळी दिली. वाघ म्हणाल्या, महिला बेपत्ता होण्याच्या घटना आताच नाही तर अगदी महाविकास आघाडीचे सरकारच्या काळातही घडल्या आहेत. कोविड काळातील २०२० मध्ये चार हजार ५१७ मुली आणि ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. तर २०२१ मध्ये तीन हजार ९३७ मुली आणि ६० हजार ४३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्लीत हे प्रमाण मुलींबाबतीत वर्षाला सरासरी १२ हजारावर तर महिलांच्या बाबतीत ६४ हजारावर आहे."

मुली-महिला बेपत्ता होण्याची बाब गंभीर आहे. यासाठी महिला नेत्यांनी एकत्र येत काम करण्याचे आवाहनही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुळे यांना केले आहे. वाघ म्हणाल्या, "बेपत्ता झालेल्या ९० टक्के मुलींचा शोध घेण्यात आला आहे. तर ७५ महिलांचा शोध घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एफआयआर दाखल केला जातो. निश्चितच ही समस्या गंभीर आहे. राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून प्रत्येक महिला नेत्यांनी एकत्र येत यावर उपाय सूचविले पाहिजेत. केवळ टीकेसाठी टीका करुन प्रश्न सुटत नसतात."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT