Eknath Shinde-Jitendra Awhad Latest News
Eknath Shinde-Jitendra Awhad Latest News sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी अन् आव्हाडांनी हातच जोडले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांना जोरदार टोले लगावले आहेत. त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. याबरोबरच अन्य नेत्यांनाही चिमटे काढले.

जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासंबधी केलेल्या विधानाचा संदर्भ देत शिंदेंना टोला लगावला होता. त्यांच्या टीकेलाही शिंदेंनी आज सडेतोड उत्तर दिले आहे. (Eknath Shinde-Jitendra Awhad Latest News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही आता सत्तेत आहोत. पुढची अडीच वर्षे आम्ही खूप चांगले काम करू आणि आमचे इतके चांगले काम होईल की त्यानंतरची पुढची पाच वर्षेही आम्हीच सत्तेत राहू. कारण आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. कोण कधी कुठे असतो, कोण बाहेर असतो, कोण आत असतो. हे काहीच कळत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी पुन्हा येईन त्यानुसार, ते आले आणि आम्हालाही सोबत आणले आहे. आता आम्ही दोघे एकत्र असून फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ते एकटेच विरोधी पक्षाला पुरून उरायचे. आता तर आम्ही दोघे आहोत, म्हणजे 'एक से भले दो", अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी फटकेबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडले होते. यामुळे सभागृहातील वातावरण हलकेफुलके बघायला मिळाले होते.

काल जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणात माझ्यावर टीका केली. निती आयोगाच्या बैठकीच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत सर्वात मागे उभा असल्याचे तुम्ही सांगितले. पण तुम्हाला माहिती आहे की तेथील बैठक खूप महत्त्वाची असते. अशा वेळी मी काय काम केले आणि कोणते मुद्दे मांडले. तसेच महाराष्ट्रासाठी काय काय मागणी केली हे तुम्ही सांगायला हवे होते. मात्र तसे न करता तुम्ही रांगेचा मुद्दा धरून बसलात मात्र तिथे रांग महत्त्वाची नसून काम महत्त्वाचे असते. पाटील ज्या प्रकारे बोलत होते, त्यावरून मला असं वाटलं की, ते राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेतात की काय, असा जोरदार टोलाही शिंदेंनी लगावला.

पुढे शिंदे म्हणाले की, जयंत पाटील मला म्हणत होते की तुम्ही आमच्या बाजूला या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण तुम्ही मला ही ऑफर देण्याआधी अजितदादांना विचारलं आहेत का? कारण तुम्हाला त्यांना विचारणे गरजेचे आहे. तुम्हाला तर विरोधी पक्षनेता पण व्हायचं होते, मात्र तुम्हाला ते होता आलं का? कालच्या भाषणावरून ते दिसत होतं आणि चेहऱ्यावरूनही दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी पाटलांना टोला लगावला.

दरम्यान, माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला गेला आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, कारण महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतलं आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांचे अश्रू पुसण्याचे कंत्राट मी घेतले आहे. जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे दु:ख दूर करण्याचे कंत्राट मी घेतले आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT