MahaVikas Aghadi Latest Marathi News
MahaVikas Aghadi Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

दोन्ही काँग्रेसकडूनचं शिवसेनेचा गेम? फोडाफोडीच्या भीतीनं मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा टेन्शनमध्ये

ज्ञानेश सावंत

मुंबई: आमदारांना फूस लावून भाजपकडून फोडाफोडीची भीती शिवसेनेला असतानाच मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) शिवसेनेच्या आमदारांना आपल्या गळाला लावण्याचा 'गेम' केला. दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या अर्धा डझन आमदारांना फोन केल्याने शिवसेना नेतृत्व प्रचंड घाबरले आहे. तर मित्रपक्षांच्या दगाबाजीने महाविकास आघाडीत अस्वस्थता परसली आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)

या हालचाली पाहता शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या आमदारांसाठी निवडलेल्या बड्या नेत्यांची फौज ठेवून, डोळ्यात तेल घालून आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना आणि त्यांच्यासोबतच्या अपक्ष आमदारांना दोन्ही काँग्रेस (Congress) आपल्या तंबूत ओढण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या आमदारांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आधी फुटलेल्या दहा मतांसह नव्याने काही आमदार फोडून विधान परिषदेची पाचवी जागा निवडून आणण्याची व्यूहरचना भाजपने (BJP) पुन्हा आखली आहे.

त्यासाठी पुन्हा शिवसेनेच्या हक्काच्या मतांवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे आमदारांना पुन्हा हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था शिवसेनेने केली आहे. तरी, भाजप या आमदारांना गाठण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेचा वचपा काढण्यासाठी या निवडणुकीत आपापली मते सांभाळून भाजपला हरविण्यासाठी महाविकास आघाडीने फिल्डिंग लावली आहे. त्यातही पाचव्या जागेसाठी २२ मते फोडावी लागणार असल्याने भाजप नेत्यांपुढची डोकेदुखी वाढली आहे. अशातच मतदानासाठी चार दिवस राहिल्याने मतांच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे.

या घडामोडी वाढल्या असतानाच पाचव्या जागेवर विजय होण्याच्या तयारी करणाऱ्या काँग्रेसनेही शिवसेनेच्या आमदारांना फोनाफोनी सुरू गेल्याने शुक्रवारी सकाळीच गोंधळ उडाला. मित्रपक्षांच्या या वागण्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही निवडणूक गुप्त पध्दतीने होणार असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना आपले आमदार सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

निवडणुकीतील पाचव्या जागेवर भाजपकडून प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. दोघांकडेही पुरेशी मते नसल्याने या लढतीत चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षासह लाड आणि भाई या आपल्या करिष्म्यावर मते मिळावी लागली. त्यातून या दोघांचा राजकीय मार्ग पुढे जा आहे. दुसरीकडे राज्यातील नव्या राजकीय समीरकरणांचे संकेत ठरविणारी ही निवडणूक असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT