Atul Londhe News Sarkarnama
मुंबई

Congress News : 'पराभवाच्या धास्तीने मोदी सरकारला महागाईची जाणीव ; गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने जनता फसणार नाही'

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : घरगुती गॅस सिलिंडरचा दर बुधवार (ता. ३०) दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. मात्र, ४५० रुपयांचा सिलिंडर ११५० रुपये करुन २०० रुपयांनी कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती असल्याचा हल्लाबोल त्यावर कॉंग्रेसने लगेच केला.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला (Modi government) महागाईची जाणीव झाली. त्यातून त्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत, असा दावा प्रदेश काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला. तरी, त्याला जनता फसणार नाही, असे ते म्हणाले. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

महागाईच्या प्रश्नाला कधीही गांभिर्याने न घेणारे मोदी सरकार सणासुदीच्या दिवशी भगिनींना गॅस सिलिंडर दरात कपात ही भेट दिल्याचे सांगत जात आहे. पण, याच भगिनी मागील नऊ वर्षांपासून महागाईचा सामना करत असताना त्यांची आठवण मोदी सरकारला कधीच झाली नाही. उलट महागाई कुठे आहे? मी, लसूण खात नाही, पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात महाग आहेत, अशी बेजबाबदार उत्तरे मोदी सरकारमधील मंत्री देत होते, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती दुप्पट वाढवून नऊ वर्षांपासून जनतेची लूट केली. २०१४ साली एलपीजी गॅस सिलिंडर ४५० रुपयांना होता. तो ११५० रुपयांपर्यंत महाग केला पण मोदींना त्याची जाणीव कधीच झाली नाही. जनतेला महागाईच्या झळा बसत असताना महागाईचा 'म' सुद्धा पंतप्रधान मोदींनी काढला नव्हता. त्यामुळे जे दर कमी केले आहेत ते केवळ पराभवाच्या भितीने केले आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमतींची झळ सर्वसामान्यांना कधी बसू दिली नाही, अनुदान देऊन जनतेला दिलासा दिला. मात्र, मोदी सरकारने सत्तेत येताच इंधनावरील कर ३२ रुपये केला. त्यातून तब्बल २६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा दरोडा जनतेच्या पैशावर टाकला.

अन्नधान्य, खाद्यतेल याच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दुध, दही, आटा व शालेय साहित्यावरही १८ टक्के जीएसटी लावून लुटले जात आहे. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिला जातो, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येताच तेथेही ५०० रुपयांना गॅस सिलिंडर दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारने आज गॅसच्या किमती कमी केल्याने फसणार नाही, असेही लोंढे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT