Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

मी सकाळी हनुमान चालीसा वाचूनच बाहेर पडतो : नाना पटोले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीन तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे हटले नाहीत तर मशिंदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पण त्याआधीच हनुमान जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी मंदिरांमध्ये जात चालिसा पठण केल्याचे पाहायला मिळाले. आता हनुमान चालिसावरून नेत्यांमध्येही चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपण रोज सकाळी हनुमान चालीसा वाचूनच बाहेर पडतो, असं म्हटलं आहे. आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, ही काँग्रेस ची भूमिका आहे, असंही पटोले म्हणाले. राज ठाकरे यांनी भाजपची (BJP) सुपारी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे केवळ कॉमेंट्री करत आहेत. महागाई वरून लक्ष बाजूला करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात एकात्मता भाईचारा संपविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही धर्माला कोणाचा विरोध नाही. पण कोणत्याही गोष्टींचा उघाच बाऊ करू नये. केंद्रसरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनात केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला. मागील निवडणुकीत राज ठाकरे यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुपारी घेतल्याचे म्हटले होते. आता राज ठाकरे यांनी त्यांची सुपारी घेतली आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

धार्मिक तेढ वाढवणाऱ्या तीन हजार पोस्ट हटवल्या

रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये झालेल्या वादातून देशातील अनेक राज्यांमध्ये दंगली उसळल्या होत्या. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातही तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लाऊडस्पीकरबाबत नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोशल मीडियातील धार्मिक तेढ वाढवणाऱ्या मेसेजसवरही पोलिसांची करडी नजर असून संबंधितांवर कारवाईही केली जाऊ शकते.

प्रामुख्याने सोशल मीडियातील मेसेजसवरही बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी सोशल मीडिया लॅब कार्यान्वित करण्यात आली असून त्यामाध्यमातून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या संदेशांवर लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक मेसेज डिलीट करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तसेच संबंधितांवर पोलिसांकडून कारवाईही केली जाऊ शकते.

एक-दोन दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली

पुढील एक-दोन दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त ही नियमावली तयार करणार आहेत. राज्यातील कायदा-सुववस्था बिघडू नये, यासाठी प्रयत्न आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT