Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

आमच्या पक्षात अनेक विद्वान, आम्हाला गरज नाही : नाना पटोले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) च्या मुद्यावरून काँग्रेसवर शऱसंधान साधले आहे. 'यूपीए'चा सातबारा सध्या काँग्रेसच्या (Congress) नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही, अशा कडक शब्दांत राऊत यांनी मत मांडलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा युपीएवरून चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही युपीएवरून काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना पटोले यांनी राऊतांना 'विद्वान' म्हटलं आहे.

पटोले म्हणाले, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षातही युपीएबाबत चर्चा होते. पण राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच आहे. भाजपचा पराभव काँग्रेसच करेल. युपीएचा अध्यक्षही काँग्रेस हायकमांड ठरवतील. पण यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आमच्या पक्षात काय करायचं ते आम्हाला माहिती आहे. आमच्या पक्षात अनेक विद्वान आहेत. आम्हाला विद्वानांची गरज नाही, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

राऊत काय म्हणाले?

भाजपप्रणीत 'एनडीए' उरलेले नाही, पण काँग्रेसप्रणीत 'यूपीए' तरी आज कोठे दिसत आहे काय? यूपीएत नक्की कोण आहे व त्यांचे काय चालले आहे याबाबत शंका आहे. विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी 'यूपीए'चा जीर्णोद्धार करणे. 'यूपीए'चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस पुढाकार घेऊन निदान 'यूपीए'च्या जीर्णोद्धारासाठी विरोधकांना साद घालेल या अपेक्षेत सगळे होते. काँग्रेस पक्षाचे स्वतःचे काही अंतर्गत, कौटुंबिक प्रश्न असू शकतात, पण हे प्रश्न विरोधकांच्या एकजुटीतील अडथळे ठरू नयेत, असं 'सामाना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी 'पुरोगामी' शक्तींना साद घातली आहे. पुरोगामी म्हणजे फालतू सेक्युलरवाद नाही. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला तो समोरच्यांना सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे. देश सगळय़ांचा आहे, पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. हिंदुत्व आणि हिंदू समाजाइतका सहिष्णू आणि पुरोगामी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व 'यूपीए'चा जीर्णोद्धार शक्य आहे. नाहीतर 'येरे माझ्या मागल्या'चा पुढचा अंक सुरूच राहील, असंही अग्रलेखात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT