Maharashtra Government News
Maharashtra Government News  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Government : शिंदे सरकार 'महाराष्ट्र स्टोरी' बनवेल का ? काँग्रेस आक्रमक ; रोज सरासरी ७० मुली बेपत्ता...

सरकारनामा ब्यूरो

Sachin Sawant Criticised Shinde Fadnavis Government : "महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत राज्यातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत," अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावलं उचलावीत अशीही मागणी चाकणकर यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांनी सांगितलेल्या या आकडेवारीनंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षानी जोरदार हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे.

सत्य घटनेवर आधारित 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरुन अनेक राजकीय पक्षानी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. या चित्रपटानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आता महाराष्ट्र स्टोरी बनवणार का? असा सवाल केला आहे. सावंत यांनी टि्वट करीत शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रश्न विचारला आहे.

रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलं आहे?

“जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे.

यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो.

खासदार सुप्रिया सुळे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात...

महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का?

याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. पुणे, नाशिक,अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2 हजार 258, नाशिक 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT