Sana Malik Sheikh
Sana Malik Sheikh  Sarkarnama
मुंबई

मलिकांच्या दोन्ही मुलीही वानखेडेंच्या विरोधात.. तर जावयाने उचलले हे पाऊल!

सरकारनामा ब्यूरो : शुक्रवार, 7 जानेवारी 2021

मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दुबईत दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्ला सुरू ठेवला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिमच असल्याचे पुरावे त्यांच्या दोन्ही मुलींनी ट्विटरवर शेअर केले.

वानखेडे यांच्या लग्नाची पत्रिका निलोफर खान यांनी ट्विट केली केली. त्यात दाऊद वानखेडे यांच्या मुलाचा निकाह असल्याचा उल्लेख आहे. तर नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना खान हिने समीर वानखेडे यांचे लग्नाचे प्रमाणपत्र ट्विट केले. त्यात समीर वानखेडे यांची बहीण ही साक्षीदार आहे. त्यात तिचे नाव यास्मिन अजीज खान असे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय फ्लेचर पटेलचा भाऊ ग्लेन पटेल हा दुसरा साक्षीदार आहे.

मलिक हे दुबईच्या दौऱ्यावर गेल्यानंतर वानखेडे यांच्याविरुद्धची त्यांची मोहीम काही दिवस बंद राहील, असे वाटले होते. मात्र त्यांनीही तेथूनही मारा सुरू ठेवला आहे. आर्य़न खान केसमध्ये उच्च न्यायालयाचा जामिनाचा लेख आदेश आज प्रसिद्ध झाला. या आदेशात एनसीबीच्या तपासावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावरून वानखेडे यांना निलंबित करण्याची मागणी मलिक यांनी दुबईतून केली. दुसरीकडे त्यांच्या दोन्ही मुलींनी वानखेडेंच्या लग्नातील पुरावे सादर केले. वानखेडे यांच्या लग्नपत्रिकेत `निकाह` असे लिहिलं आहे. तसेच त्यांच्या वडिलांचा उल्लेख दाऊद वानखेडे असा आहे.

जावई समीर खान यांची न्यायालयात याचिका

दुसरीकडे अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी आता गुन्हा रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समीर यांच्याकडे कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. त्यांचा रासायनिक अहवाल नकारात्मक आहे. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा दावा याचिकेत केला गेला आहे.

या अहवालानुसार समीर खान यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोगस आणि खोटी तक्रार दाखल केली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. खान मागील नऊ महिने कारागृहात होते. विशेष न्यायालयाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणातील एका सहआरोपीने खान यांचे नाव घेतले होते. त्याच्या जबाबावरून एनसीबीने खान यांना अटक केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार कोणत्याही आरोपीचा जबाब पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्यावर पुरावे नसताना जाणीवपूर्वक आरोप केले आहेत, असा दावा खान यांनी केला आहे. केवळ अन्य आरोपींनी आरोप केले यावरून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. माझ्याजवळ कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत, त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी खान यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT