<div class="paragraphs"><p>Kalicharan Maharaj</p></div>

Kalicharan Maharaj

 

Sarkarnama

मुंबई

अकोल्याचे कालीचरण महाराज अडचणीत; विधानसभेत अजितदादांनीच दिले स्पष्ट संकेत...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : छत्तीसगढची राजधानी रायपुर (Raipur) येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसद (Dharma Sansad) रविवारी संपली. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील अकोला येथील कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी महात्मा गांधीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. सत्ताधारी पक्षातील अनेकांनी महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली.

कालीचरण महाराज यांनी संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी अपशब्द वापरून महाराजांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची नथुराम गोडसे (Nathuram Godse) याने हत्या केल्याचे सांगत गोडसेचे कौतूकही केले. सोमवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

मलिक म्हणाले, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना शिवीगाळ केली आहे. ही घटना राज्याबाहेरील असली तरी महाराज अकोल्यातील आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक करावी करावी, अशी मागणी मलिकांनी केली. त्याला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही कडक कारवाईची मागणी केली.

सदस्यांचे बोलून झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाला कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. या घटनेची माहिती घेवून संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असं पवारांनी स्पष्ट केलं. कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या छत्तीसगड पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनीही ट्विटरवर व्हिडीओ टाकत त्याचा निषेध केला आहे. हा भगवाधारी फ्रॉड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उघडपणे शिव्या देत आहे. त्याता लगेच तुरुंगात टाकायला हवे. गांधीविषयी वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं निरूपम यांनी म्हटलं आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदीजी, तुम्ही हा देश कसा बनवला. महात्मा गांधींना शिव्या दिल्या जात आहेत. समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. हीच खरी महात्मा गांधींना श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT