Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News: फडणवीसांकडून पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन ? 'महाभारता'चा दाखल देत म्हणाले...

Maharashtra Politics : ''...तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे!''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात मागील वर्षी शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उभी फूट पडली होती. नंतर आता वर्षभरातच अजित पवारांनी वरिष्ठ नेतेमंडळींना सोबत घेत आमदारांच्या मोठ्या गटासह बंडखोरी केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या फुटीमागे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येतो. पण आता फडणवीसांनी केलेल्या महाभारताचा संदर्भ देत पक्ष फोडाफोडीचं समर्थन केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी येथील एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे. ही राजकीय मैत्री कदाचित दहा वर्षांनी ती सुद्धा भावनिक युती होईल असंही फडणवीस यांनी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्याबरोबर जाता? हा दगा, हा खंजीर देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता, मी निमित्त होतं. हा खंजीर भाजपा(BJP)च्या पाठीत खुपसला. ज्या भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्ष उभा केला त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. याचं उत्तर देणं आपल्याला गरजेचं होतं.

त्यावेळी मला अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं की, तू दहा अपमान सहन कर, पण बेईमानी सहन करु नको. जो बेईमानी सहन करतो तो टिकत. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्यासाठी घाम गाळला ही त्यांच्याशीही बदनामी होती. म्हणून एकच गोष्ट सांगायची की, आज आपण जे करतो आहे. त्याविषयी तुमच्या मनात शंका असू देऊ नका. हा धर्म आहे, हा अधर्म नाही असंही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं.

'' ज्या ज्यावेळी अन्याय होईल तेव्हा...''

कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्या शिवाय त्याला मारता येणार नाही. कृष्णाने काय काय केलं. भीष्माला हल्ला करण्यासाठी शिखंडीला समोर आणलं. अश्वथामाबाबतही 'नरो वा कुंजरोहा' ही भूमिका घ्यावी लागली. ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीती करावी लागते, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. दोन दोन पक्ष फोडले घर फोडले असा आरोप होतो. जनाधराचा अपमान कोणी केला असा प्रश्न करताना ज्या ज्यावेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येईल असे वक्तव्यही त्यांनी केले.

'' धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती...''

जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. परित्राणाय साधूनाम लक्षात आहे पण विनाशाय दुष्कृताम हे देखील लक्षात ठेवावंच लागेल. अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. पण नैतिकतेने राजकारण करण्यासाठी राजकारणासह रहावं लागतं. महाभारतात श्रीकृष्णाला माहित होतं की, धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावी लागते असंही महाभारतातलं उदाहरण देत त्यांनी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर थेट समर्थनच केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT