Nana Patole-Congress
Nana Patole-Congress Sarkarnama
मुंबई

Congress : विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे डिमांड

Jagdish Patil

Mumbai News, 11 June : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा आल्या, तर काँग्रेसने या निवडणुकीत चांगली मुसंडी मारली. काँग्रेससह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं.

त्यानंतर आता मिशन विधानसभा डोळ्यांपुढे ठेवून आघाडीतील पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता राज्यातील महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

मंगळवारी (ता. 11 जून) रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि टंचाईग्रस्त भागात पिण्याचे पाणी पुरवावे अशी मागणी या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे याचं गांभीर्य महायुती सरकारला नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुकीनंतरही त्या सुरुच आहेत. 'डीबीटी'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे देण्यात आली नाहीत.

टेंडरशिवाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंमती वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली. मात्र याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांनाच बाजूला करण्यात आलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला. काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटल्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केले.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते. तर काही मंत्री थेट परदेशात गेले. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या मंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती, याचा खुलासा झाला पाहिजे.

शेतकरी संकटात सापडला असून त्याला आता आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसंच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 4 लाख रुपये द्यावेत. जनावरांसाठी चारा छावण्या तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी याशिवाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावी अशी मागणी राज्यपालांना भेटून केल्याचं त्यांनी सांगितलं.

तर सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेले महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचंही पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला काही महिने उरले असतानाच काँग्रेसने केलेल्या या मागणीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT