Dombivali News
Dombivali News  Sarkarnama
मुंबई

Dombivali News : अंधारेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदला रिक्षाचालकांचा विरोध!

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने शनिवारी डोंबिवली बंद चे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये रिक्षा संघटना देखील सहभागी होणार असल्याचा दावा पक्षाच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.लालबावटा रिक्षा संघटनेने मात्र यात सहभागी न होण्याचा निर्णय घेत थेट शिंदे गटाला आव्हान दिले आहे. राजकीय बंद मध्ये रिक्षाचालकांना ओढून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे हे चुकीचे आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी या बंद विषयी मांडले. (Dombivali News)

शिवसेना उपनेत्या अंधारे यांचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने शनिवारी डोंबिवली बंद चे आवाहन करण्यात आले आहे. या बंद ला व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोसिएशन यांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केला. ही पत्रकार परिषद होत नाही तोच डोंबिवली रिक्षा संघटना, चालक याविषयी संताप व्यक्त करीत आहेत. राजकीय बंद मध्ये रिक्षाचालकांना ओढून घेऊ नका असे चालकांचे म्हणणे आहे.

युनियनने बंद मध्ये सामील होण्याचे निर्णय घेतला आहे असा कोणताही आदेश अद्याप आम्हाला मिळालेला नाही. रिक्षा चालकांवर ज्या वेळेस अन्याय होतो तेव्हा रिक्षा बंद आंदोलन का केले जात नाही. हे युनियनवाले त्या वेळेस कोठे असतात. आम्ही या बंद मध्ये सहभागी होणार नाही असे मत चालक हरिष चव्हाण यांनी व्यक्त केले.

तुमचे राजकारण तुम्हाला लख लाभो. राजकारणात रिक्षा चालकांचा बळी घेतला जात आहे. बंद म्हटले की पहिले रिक्षाचालक टार्गेट केले जातात. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले जाते. सर्व रिक्षाचालकांनी मिळून याला विरोध केला पाहिजे. हे राजकारणी रिक्षाचालकांचा बळी घेऊन स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे आमचा पाठिंबा त्यांना नाही असे चालक प्रसाद नाटेकर यांनी सांगितले.

उद्याचा बंद हा राजकीय बंद आहे आणि या राजकीय बंद मध्ये रिक्षाचालकांवर दबाव टाकून रिक्षा बंद ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आमचा लाल बावटा रिक्षाचालक मालक संघटनेने या बंद मध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे.

सुषमा अंधारे यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. सुषमा अंधारे यांचे दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचे भाषण एडिटिंग करून, लोकांच्या भावना भडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या धार्मिक भावना भडकविण्याचे व राज्यात भावनिक वातावरण निर्माण करण्याचे राजकारण सुरू केले आहे. राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले जात आहे.

खरं तर सरकारच्या वतीने असे तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय हे निषेधार्ह आहे. म्हणून उद्याच्या बंद मध्ये सामील न होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. रिक्षा चालकांनी या राजकीय बंद मध्ये सामिल होवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी पोलिसांनी याची योग्य ती दखल घेऊन, प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे, असे लालबावटा रिक्षा चालक मालक युनियन अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी म्हंटले.

राजकीय पटलावर त्यांचा वैयक्तिक निषेध करावा तो त्यांचा हक्क. परंतु लोकांना गृहीत धरून प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टी, मागण्या पूर्ण करण्यासाठी बंद करणे चुकीचे आहे. ग्राहकांना ग्राहका प्रमाणे वागवा, त्यांना गुलाम प्रमाणे वागवू नका, असे पाम प्रवासी संघटनेचे सचिन गवळी यांनी म्हंटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT