Eknath Shinde :
Eknath Shinde : Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : "बाळासाहेब देणारे होते, घेणारे नव्हते.." ; शिंदेचा टोला कुणाला?

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्य सरकारकडून बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण सोहळा पार पडले. राज्याच्या विधिमंडळ सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, "शिवसेनाप्रमुखांमुळे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते विधानसभा लोकसभेपर्यंत पोहचू शकले. त्यांच्या विचाराचं सरकारही आपण स्थापन करू शकलो. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतंय, हा माझ्यासाठी महत्वाचा क्षण आहे."

"लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी त्याची अंमलबजावणी केली. एकेकाळी महाराष्ट्रात काही ठराविक घराण्यांची सत्ता होती. बाळासाहेबांनी सत्ता सर्वसामान्यांपर्य़ंत पोहचवण्याचं काम केलं. सामान्य लोकांना बाळासाहेबांनी महत्त्वाची पदे दिली. अन्यायाविरूद्ध लढा ही बाळासाहेबांची शिकवण. बाळासाहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. पुन्हा फिरवायचे नाही. तीच गोष्ट आम्ही शिकलो. त्यांच्याशिकवणीमुळे अनेक घडामोडी या राज्यात घडल्या. शेवटी धाडस हे महत्त्वाचं असतं. धाडस करायला हिंमत लागते, ताकद लागते. त्यासाठीगुरू देखील ताकदवान लागतात, " असंही शिंदे म्हणाले.

"यावेळी मला आनंद दिघेंचीही आठवण येते. दिघे साहेब असते. आज त्यांचा ऊर भरून आला असता. आनंदी झाले असते . बाळासाहेब जेव्हा ठाण्यात यायचे तेव्हा साहेब अभिमामनाने सांगायचे हा दिघेंच्या तालमीत तयार झालेला एकनाथ शिंदे आहे. आता मला ठाण्याची चिंता नाही. एवढा विश्वास साहेबांचा होता. साहेब सांगायचे ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली, त्यांच्या काही अपेक्षा असतात. तुम्हाला वाकडं तिकडं वागता येणार नाही.ठाण्याची सत्ता ३० वषे शिवसेनेकडे आहे.बाळासाहेब नेहमी सांगायचे, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर कोणती शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. याचा अनुभव आता आपण घेत आहोत," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"काही मुस्लिम बांधव मातोश्रीवर आले. त्यांची नमाजाची वेळ झाली. बाळासाहेबांनी त्यांना नमाज पडायला जागा दिली. पण या हिंदुस्थानात राहून पाकीस्तानचे गोडवे जे गात होते. त्यांच्याबद्दल साहेबांचं काय मत होतं, हे मला सांगायची आवश्यकता नाही. काही गोष्टी मी मुख्यमंत्री असल्यामुळे बोलू शकत नाही," असे शिंदे म्हणाले.

"सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, आपल्या विचारांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, हे देखील आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे. त्यांचा विचार होता, गडकोट संवर्धन झालं पाहिजे. ती भूमिका आमच्या सरकारने घेतली. बाळासाहेबांचं नाव घेताना, त्यांचा विचार पुढे नेताना, आम्हाला कसलीही तमा बाळगायची गरज नाही," असंही मुख्यमंत्री म्हणाले.

"डावखरे साहेबांना बिनविरोध द्यायचं होतं,तेव्हा मी आणि डावखरे साहेब गेलो. साहेब आपल्याला यांना मदत करायची आहे. काय वेडा झालाय का तू ? मिडीयावाले दांडकेघेऊन येतील, त्यांना काय सांगू मी उमेदवार उभा करत नाही. मी म्हणालो, तुम्हाला कोण विचारणार? आणि डावखरेंना खाली पाठवून मला म्हणाले, डावखरे चांगला माणूस आहे ना? म्हणालो, खूप चांगले आहेत ते. आपल्याला नेहमी सहकार्य असतं. आणि तातडीने त्यांना निर्णय घेतला," अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

"बाळासाहेबांनी सर्व पदे शिवसैनिकांना वाटून टाकली. मोकळ्या हाताने दिलं. स्वत:साठी काही ठेवलं नाही. बाळासाहेब हे देणारे होते, घेणारे नव्हते," असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT