Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; CM, DCM यांची दिल्लीवारी सक्सेस होणार?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाचा फटका सत्ताधाऱ्यांना सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीत संभाव्य 'डॅमेज कंट्रोल'साठी महायुतीने विधान परिषदेतून जातीय समीकरण साधल्याचे दिसून आले.

आता महायुतीतील नेते मंत्रिमंडळ विस्तार करून राज्यात 'सोशल इंजिनिअरिंग'चा पॅटर्न राबवण्याच्या विचारात आहेत. त्या दृष्टीने यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांची भेटी घेतल्या. त्यानंतर आज अचानकच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना दिल्लीला जावे लागले. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली.

कृषि विभागाच्या एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde 10 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. कार्यक्रमाशिवाय त्यांचा अडीच तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला होता. त्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

विधानपरिषदेचा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ दिल्ली गाठली होती. ते केंद्रीय मंत्री अमित शाहांशी मंत्रिमंडळ विस्तारावरच बोलल्याची चर्चा आहे. त्यानंतर आज सोमवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांना गडबडीत दिल्लीला जावे लागले. या एकापाठोपाठ एका दिल्लीवारीमुळे राज्यात मोठी घडामोड होणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. तो टाळण्याच्या दृष्टीने महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शक्यता आहे. यावेळी विभागानिहाय जातीय समीकरण साधून विरोधात असलेली स्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थितीमुळे मंत्रिमंडळ विस्तारातून छोट्या-मोठ्या जातींना न्याय देण्याचे सरकारपुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे सरकार मंत्रिमंडळ विस्तारात जातीय गणित कसे साधणार, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, राज्यात तब्बल दोन वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यावेळी शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र अजित पवार Ajit pawar गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची वारंवार चर्चा झाली, मात्र त्यावर काहीही झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कुणालाही नाराज करणार नसल्याचे बोलले जाते.

दरम्यान, आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच संजय कुटे, आशिष शेलार यांचीही नावे घेतली जातात. तर अजित पवार गटाकडून मावळचे आमदार सुनील शेळके आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट यांचे नाव पुढे केली जातात. आता विस्तार झालाच तर कुणा-कुणाची वर्णी लागणार, याचीच उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT