Uddhav Thackeray Latest Marathi News, Sanjay Shirsat Latest News, Eknath Shinde News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Sanjay Shirsat Latest News, Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

उद्धवसाहेब, तुमचे बडवे आम्हाला ताटकळत ठेवायचे! आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची उघडली, या पहिल्याच वाक्यात त्यांनी ठाकरेंवर वार केला आहे. तसेच तुमच्याभोवतीचे बडवे आम्हाला बंगल्याबाहेर ताटकळत ठेवायचे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे. (Eknath Shinde Latest News)

शिरसाट यांच्यासह एकनाथ शिंदे यांनीही हे पत्र ट्विट केले आहे. शिंदे यांनी पत्र ट्विट करताना ही आहे आमदारांची भावना असं म्हटलं आहे. 'आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, अशा शब्दांत शिरसाट यांनी पत्राची सुरूवात केली आहे. असं पत्राच्या सुरूवातीला म्हटलं आहे. (MLA Sanjay Shirsats letter to CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शिरसाट म्हणतात...

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली, असं म्हणत शिरसाट यांनी पहिल्याच वाक्यात उद्धव ठाकरे यांच्यावर वार केला आहे. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यावर प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आणच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच सो कॉल्ड (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याला निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

- शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवश मिळाला नाही.

- मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही. कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

- भेटायला गेल्यानंतर तासनतास वर्षा बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. शेवटी कंटाळून निघून जायचो.

- आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा दरवाजा उघडा होता. आमची गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.

- आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.

- आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून का रोखलं? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

- आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोध काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते.

- या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.

- काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं, लोभ असावा, अशा शब्दांत शिरसाट यांनी पत्राचा शेवट केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT