MLA Nitin Deshmukh Latest Marathi News, Eknath Shinde News, Shiv Sena Latest News
MLA Nitin Deshmukh Latest Marathi News, Eknath Shinde News, Shiv Sena Latest News Sarkarnama
मुंबई

शिंदेंसोबत असलेल्या नऊ आमदारांच्या अपहरणाची कुटुंबीयांकडून तक्रार! मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तातडीने पक्षाचे प्रमुख नेते व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. बैठकीनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धक्कादायक माहिती दिली. शिंदे यांच्यासोबत असलेल्या नऊ आमदारांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. देशमुख यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यातच आता राऊत यांनी आतापर्यंत नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दिल्याची माहिती दिली. राऊत म्हणाले, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी तक्रार केली आहे. देशमुख यांचे अपहरण करून सुरतला नेले असून त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी त्यांची तक्रार आहे. नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत अशा तक्रारी केल्या आहेत. हे असंच सुरू राहिलं तर मुंबई पोलिसांना याप्रकरणात कठोर कारवाई करावी लागेल.

यामागे भाजपचे षडयंत्र आहे. अनेक दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होते. तो प्रकार त्यांनी सुरू केला आहे. तसं नसतं तर आमच्या आमदारांना किडनॅप करून गुजरातला नेलं नसतं. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याचे इथे समजले आहे. काही आमदारांनी कळवले आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं राऊतांनी सांगितलं.

यातून शिवसेना बाहेर पडेल. संघटन पुन्हा एकदा उभं राहील. संघटनेला कुठंही तडा गेलेला नाही. अनेक आमदारांनी वेगवेगळ्या पध्दतीने संपर्क साधला आहे. एकनाथ शिंदे आम्हा सगळ्यांचे मित्र आहेत. एकत्र काम केले आहेत. त्यांच्या मनात काही गैरसमज झाले असतील तर दूर होऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना आवाहन केले आहे की, तुम्ही मुंबईत यावे. तिथे जाऊन चर्चा करणे हे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

हे सरकार अडीच वर्षे ठामपणे चालेल, असं सांगत राऊत म्हणाले, कुणालाही पोटनिवडणूक नको आहे. तसं झालं तर हे आमदारांचंच नुकसान आहे. देशभरातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला असल्याचेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT