uddhav thackeray | election commission sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोग 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; नेमकं प्रकरण काय?

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात संथ गतीनं मतदान झालं होतं. त्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका आणि आरोप केले होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे.

अहवालात उद्धव ठाकरे यांचे आरोप निराधार असल्याचं सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांतील मतदान पार पडलं. तेव्हा, मुंबईसह ठाण्यात संथ मतदानामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगानं कुठलीही व्यवस्था केला नसल्याचा आरोप करीत अनेक ठिकाणी मतदारांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हा, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं होतं.

मतदारांचा शिवसेनेला ( ठाकरे गट) भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून मतदानास दिरंगाई केली जात आहे. कडाक्याच्या उन्हात बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानं निराश होऊन मतदार माघारी गेले. वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ करण्यात आला. निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणाने वागले. आयोगानं मोदींच्या घरगड्यासारखं काम केल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला होता.

त्यासह आयोगाच्या माध्यमातून निवडणूक भाजपनं विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदनाचा 'खेळ' खेळल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी आयोगाकडे पत्र लिहित केली होती. त्यापार्श्वभूमीवर आयोगानं ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचा तपशील राज्याच्या निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मागविला होता.

तपशील सादर केल्यानंतर आयोगानं ठाकरेंवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाकरे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाकरेंनी उल्लेख केलेल्या परिसरात खरोखर मतदान संथ गतीनं झालं होतं का? मतदारांच्या रांगा लागलेल्या का? याबद्दल पुरावे मागून वुस्तुस्थिती काय होती? हा अहवाल मागविण्यात आला आहे.

कारवाई होणार?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांत तथ्य होते की केवळं बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे आरोप केले होते, याची याची शहानिशा केली जाणार आहे. ठाकरेंनी केवळ राजकीय भूमिकेतून आरोप केल्याचं समोर आल्यास त्यांच्याविरोधात आयोग नियमानुसार कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT