Sadabhau Khot News, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News
Sadabhau Khot News, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News Sarkarnama
मुंबई

फडणवीसांनी दाखवलेला विश्वास आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकवेन : सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माझ्या विधान परिषदेच्या (Legislative Council Election) अपक्ष उमेदवारीला भारतीय जनता पक्षाने (BJP) पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. विशेषतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकविण्याचा प्रयत्न करेन. तसेच, महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या आमदारांकडे मी मत मागणार आहे, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्पष्ट केले. (Faith shown by Fadnavis will last till the end of life : Sadabhau Khot)

विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना खोत यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी विधान परिषदेला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यातील जे आमदार, ज्यांचं पोट शेतीवर चालतं, हे सर्व आमदार मला पाठिंबा देतील, ज्यांच्या पोटात शेतकऱ्यांच्या अन्नाचं दोन घास जात आहेत, ते निश्चितपणे त्या अन्नाची परतफेड म्हणून मला या निवडणुकीत मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, गेल्या तीस ते ३२ वर्षे चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं उभा केली. लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो. आमदार झाल्यावरसुद्धा शेतकऱ्यांचं गऱ्हाणं त्या व्यासपीठावर मांडलं. मंत्री झाल्यानंतर संपूर्ण राज्यात फिरलो आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अलिकडच्या काळात एसटी कर्मचाऱ्यापासून दूध, कांदा, ऊस, वीज आदी अनेक प्रश्नावर आंदोलने राज्यात उभा केली. मुंबईत मंत्रालयासमोर ही गाऱ्हाणी मांडली. त्यामुळे मला खात्री आहे की, या निवडणुकीत विजयी होण्याला मला निश्चिपणानं कुठलीही अडचण येणार नाही.

तीन ते साडेतीन लाख लोकांनी आमदारांना निवडून दिलेलं असतं. याला कोणी घोडेबाजार म्हणायला लागलं तर आमदारांवरील जनतेचा विश्वास उडेल. लोकशाही अधिक प्रगल्भ व्हायची असेल तर तिचा विस्तार होणे गरजेचे आहे. अनेक उमेदवार निवडणुकीला उभे राहिले तर मतदारांसमोर अनेक पर्याय उभे राहतील. या गोष्टींमुळेच या निवडणुकीत मतदारांसमोर अनेक पर्याय असणार आहेत, असे सांगून भाजपने विधान परिषद निवडणुकीत उतरवलेल्या उमेदवारांचे खोतांनी समर्थन केलं.

ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपला कार्यकर्ता निवडून यावा, यासाठी प्रयत्न करत असतो. मी तर आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे मला सगळ्यांकडेच मतं मागावी लाणार आहेत. मला खात्री आहे की या निवडणुकीत शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून गावगाड्यातील आणि शहरातील आमदार मला मतदान करतील. जे आमदार लोकांमधून निवडून आले आहात. त्या सर्व आमदारांना मत मागावंच लागणार आहे. कारण, ते मतदान करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT