Param Bir Singh
Param Bir Singh  Sarkarnama
मुंबई

परमबीरसिंह चंडीगडमध्ये; सोशल मीडियावर प्रकटले अन् लगेच पुन्हा गायब!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. यानंतर सोशल मीडियावर ते आज काही काळ प्रकटले अन् पुन्हा गायब झाले. ते चंडीगडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले असून, मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले. पुढील 48 तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याची कबुलीही त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र आज अचानक ते सोशल मीडियावर काही वेळासाठी अॅक्टिव्ह झाले होते. टेलिग्राम या सोशल मिडिया अॅपवर ते ऑनलाइन होते. मात्र, काही वेळातच त्यांनी त्यांचे अकाऊंट डिलिट केले. ते सध्या चंडीगडमध्येच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यामुळे ते लवकरच मुंबईत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी परमबीरसिंहांवर ताशेरे ओढले होते. न्यायालय म्हणाले होते की, परमबीरसिंह हे जगाच्या कोणत्या भागात सध्या आहेत? तुम्ही या देशात आहात की परदेशात? आधी तुमचा ठावठिकाणा सांगा. तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे, हेच तुम्ही दाखवून देत आहात. तुम्ही पोलीस आयुक्त होता म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही. केवळ अटकेपासून संरक्षण मिळाले तरच भारतात येणार, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

परमबीरसिंह यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना फरारी गुन्हेगार घोषित केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT