Devendra Fadanvis
Devendra Fadanvis 
मुंबई

‘नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवतेय सरकार’

अतुल मेहेरे

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज एक पॅकेज जाहीर केले. बळीराजाला अतिशय तोकडी मदत जाहिर केली आहे आणि ती देताना सुद्धा निव्वळ बहाणे शोधले आहेत. मुळात नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार करत असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

श्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकऱ्यां‍चे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही बळीराजाच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी २५००० आणि ५०००० रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता देण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर आली, तर विविध कारणे पुढे केली जात आहेत. ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री करीत आहेत.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकऱ्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे, फसवणूक केली आहे. किमान शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकऱ्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT