CM Eknath Shinde, Sachin Sawant Sarkarnama
मुंबई

Sachin Sawant Congress : 'त्या' वाऱ्याची हिंमतच कशी झाली जोराने वाहण्याची? गुन्हा करा दाखल

Jagdish Patil

Mumbai News, 28 August : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे राज्यभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेवरून राज्यातील राजकारण देखील तापलं आहे.

मात्र, सत्ताधारी नेते या घटनेवरून काहीही वक्तव्य करताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला, असं संतापजनक वक्तव्य केलं.

तर केसरकर यांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा पडण्याला वारा कारणीभूत असल्याचा दावा केला. त्यांच्या याच दाव्यावरून आता काँग्रेस (Congress) नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी ' वाऱ्याची हिंमत कशी झाली 45 किमी वेगाने वाहायची?' असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

वाऱ्याची चौकशी आता ईडी, 'सीबीआय'कडे

आपल्या एक्स अकाऊंटवरून त्यांनी लिहिलं, "परंतु त्या वाऱ्याची हिंमत कशी झाली 45 किमी वेगाने वाहायची? मुख्यमंत्र्यांनी वाऱ्याला बरोबरच दोषी धरले आहे. समुद्राच्या वाऱ्याने खरे तर स्लो मोशनमध्ये वाहिले पाहिजे. आता तत्काळ पोलिसांनी वाऱ्याला अटक केली पाहिजे. वाऱ्याची चौकशी आता ईडी, 'सीबीआय'कडे देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. मागे तिवरे धरणफुटी प्रकरणात दोषी खेकड्यांना सोडून दिले ती चूक पुन्हा करु नये." अशा शब्दात त्यांनी खोचक टोला एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, "झालेली घटना दुर्दैवी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाइन केलं होतं. याप्रकरणी मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की, 45 किलो मीटर पर अवर असा वारा वाहत होता, त्यामुळे ही घटना घडली. उद्या त्या ठिकाणी नेव्हीचे अधिकारी येणार असून तत्काळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्याचं काम आम्ही करू."

थातूरमातूर कारणे देणं बंद करा

दरम्यान, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांगलंच सुनावलं, त्यांनी लिहिलं, "ऐकलं का हो मुख्यमंत्री महोदय, अहो, ताशी 45 किमीच्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी कोकणातल्या नारळी झाडांवरची नारळं सुद्धा खाली पडत नाहीत

मात्र, तुमच्या सरकारने गाजावाजा करीत उभारलेला महाराजांचा पुतळा खाली कोसळला. थातूरमातूर कारणे देणं बंद करा. मुद्द्याचं बोला, दोषी कंत्राटदाराला अटक कधी होणार? या संपूर्ण घटनेत सरकारचा काहीच दोष नाही का? अहो राजेंखातर तरी जरा खरं बोला."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT