Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde : सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो; खासदार शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) घणाघाती टीका केली. ''राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे खांद्याला खांदा लावून काम करतायेत. अगोदर केवळ 'वर्क फॉर्म होम' व्हायचे आज 'वर्क विदाऊट होम' होत आहे'', असा टोला लगावत ''सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो त्याच चांगलं उदाहरण विरोधकांच्या वर्तनातून दिसतंय'', असं म्हणत खासदार शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने कल्याणमध्ये आयोजित महारोजगार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, ''एकीकडे मोर्चे काढून लोकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आगळावेगळा कार्यक्रम राबवून युवकांना रोजगार देण्याचे काम केले जात आहे. हा केवढा मोठा विरोधाभास असल्याचं'' खासदार शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी तरुणांना उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी यांसह सरकार करत असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. काही विकासकामे कल्याण लोकसभा मतदार संघात शिल्लक असून त्यासाठी लागणारा निधी मंत्री लोढा यांनी द्यावा, अशी मागणी यावेळी शिंदे यांनी लोढा यांच्याकडे केली. यावर तुमचेच सर्व काही आहे असे लोढा यांनी बोलताच खासदारांनी हसून त्याला दाद दिली.

महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत (Mumbai) शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावरुन खासदार शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष केले. खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ''आज किती विरोधाभास आहे की एकीकडे लोकांना वेठीस धरुन मोर्चा निघत आहे. गेल्या अडीच वर्षात ते हे करु शकलेले नाही ते आज पाच महिन्यात या सरकारने केले आहे. म्हणून आज त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकायला लागली आहे. आपले अस्तित्व कुठेतरी लोकांमधून मिटत चालले आहे. लोकांचा आज तुमच्यावरचा विश्वास उठला आहे, तर या सरकारवरचा भरोसा वाढू लागला आहे'', असं ते म्हणाले.

''अडीच वर्षात जे करु शकत होते त्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून आज मोठे मोर्चे काढून लोकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. पण आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आगळा वेगळा कार्यक्रम राबवून युवकांना रोजगार देण्याचे काम आम्ही केले हा एक वेगळा विरोधाभास आहे. हे असेच काम सरकार येणाऱ्या पुढील काळात करत राहील आणि चांगले लोकहिताचे निर्णय घेत राहील. राज्याचे मंत्रीमंडळ हे चांगले काम कसे होईल याकडे लक्ष देत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे हा मेळावा आहे''असेही खासदार शिंदे म्हणाले.

''आज हजारो तरुणांना या रोजगाराच्या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त होत आहे. विरोधकांना आज काही काम उरलेले नाही. फक्त आलोचना त्यांच्याकडून होते. उठलं की लोकांना शिव्या घालायच्या, उठलं की लोकांवर टीका करायची एवढच काम विरोधकांना उरलेले आहे. म्हणजे सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो त्याच चांगलं उदाहरण विरोधकांच्या वर्तनातून दिसते. दिवसाची सुरुवात स्वतःची तर वाईट होतेच, पण लोकांची सुरुवात देखील वाईट गोष्टींपासून करायची. लोकहिताचे काम करण्याचे काम हे आत्ताचे सरकार करत आहे'', असं यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT