Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh Kshirsagar
Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh Kshirsagar Sarkarnama
मुंबई

राज्यसभेवेळी माझी आठवण का झाली नाही? : दीड महिन्यानंतर राजेश क्षीरसागर यांची खदखद बाहेर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वादात शिवसेनेत सातत्याने नवे गौप्यस्फोट होत आहेत. आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट करत राज्यसभेला संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या उमेदवारीला कोल्हापूरमधून विरोध होता, असा गौप्यस्फोट केला आहे. या गद्दाराला उमेदवारी का दिली? उद्धव ठाकरे यांच्या एका शब्दावर मी माझा मतदारसंघ काँग्रेसला सोडला, मग तरीही राज्यसभेला माझी आठवण आली नाही का? असा सवाल विचारला आहे.

क्षीरसागर म्हणाले, मी नेहमी म्हणतं होतो की देव मंदिरातच ठेवायला हवा होता. तो देव बाहेर निघाला आणि आता त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे, मातोश्री डॅमेज होत आहे, हे आता त्यांनी स्वतः मान्य केले आहे. ज्यावेळी भाजपला डावलून महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी शिवसेनेचे खच्चीकरण सुरु झाले.

क्षीरसागर म्हणाले, सरकारमध्ये असताना आम्हाला हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेता येत नव्हती. नवाब मलिक प्रकरणात आम्हाला काहीही बोलता आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी देखील आम्हाला भूमिका घेता आली नाही, असा आरोप करत ही गद्दारी नाही तर क्रांती आहे. शिवसेना दुसऱ्याच्या हातात जात होती म्हणून ही क्रांती केली, असेही स्पष्टीकरण राजेश क्षीरसागर यांनी केले.

त्यावेळी पक्षाला माझी आठवण झाली नाही का?

राजेश क्षीरसागर म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्या एका शब्दावर पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडला, काँग्रेसचा प्रचार केला. मग पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण का नाही झाली? राज्यसभेला संजय पवार यांच्यासारख्या गद्दाराला का उमेदवारी देण्यात आली? पवार कोणत्याही निवडणुकीत पक्षासोबत, शिवसेनेसोबत नसायचे. ते सातत्याने पक्षाविरोधी काम करायचे. त्यातून त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते.

मग त्यानंतर देखील संजय पवार यांना सन्मानाने पक्षात घेवून राज्यसभेची उमेदवारी दिली. हे कशासाठी? असा सवाल विचारत संजय पवार यांच्या उमेदवारीला आपला कडाडून विरोध होता हे आता त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे सांगून टाकले आहे. या सगळ्यामुळेच कोटा असून देखील पवार पडले अशी खोचक टीका केली. शिवाय ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीकाही क्षीरसागर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT