Imtiaz Jaleel latest Marathi news, Imtiaz Jaleel news
Imtiaz Jaleel latest Marathi news, Imtiaz Jaleel news  
मुंबई

आधी नतमस्तक झाले आणि आता म्हणतात, औरंगजेब आणि मुघलांशी आमचा संबंध नाही...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (imtiaz jaleel), अकबरुद्दीन ओवेसी यांनी भगवा फेटा घालत औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले. पण औरंगजेब आणि मुघलांशी आमचा काही संबंध असं म्हणत त्यांनी युटर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज जलील बोलत होते. (AIMIM Imtiaz Jaleel Latest Marathi news)

''औरंगजेब एमआयएम पक्षाचा कधीच ‘आदर्श’ नव्हता. गेल्या चारशे वर्षांतील चुकांचे खापर आताच्या मुस्लीम समाजावर का फोडता? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही, कारभारावरून मतदान होईल, असेही जलील यांनी म्हंटले आहे.

एमआयएम कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असते. मग औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होण्याचा अर्थ काय? असा सवाल केला असता इम्तियाज जलील म्हणाले की, आम्ही जाणीवपूर्वक औरंगजेबाच्या कबरीवर गेलो नव्हतो. पानचक्की आणि खुलताबाद येथे अकबरुद्दीन ओवेसी यांचा दौरा नियोजित होता. त्यावेळी आम्ही जरजरी बक्ष कबरीसह इतर कबरीवरही दुवा मागितली.

मुस्लीम समाजात कबरीतील प्रत्येकासाठी दुआ मागण्याची पद्धत आहे. म्हणून आम्ही औरंगजेबाच्या कबरीवर गेलो होतो. आम्ही गेलो म्हणून इतका मोठा वाद केला. पण शेतकरी नेते राकेश टिकेत हेदेखील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आले. पण एमआयएमला राष्ट्रद्रोही ठरविण्यासाठी एवढा मोठा वाद करण्यात आला.

म्हणजे औरंगजेब एमआयएमचा आदर्श आहे की नाही? या प्रश्नावर बोलताना जलील म्हणाले, ''आमचा औरंगजेबाशी आणि कोणत्याही मुघलांशी संबंध नाही आणि संबंध जोडून आम्ही राजकारण करू इच्छित नाही. चारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा आमच्याशी संबंध जोडून आजच्या मुस्लिमांना त्रास कशासाठी द्यायचा? पूर्वीही आम्हाला रझाकाराची औलाद अशी विशेषणे लावली जात होती.''

१७ सप्टेंबरच्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला न गेल्यामुळे आमच्यावर टीका झाली. पण आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होतो. पण त्यामुळे प्रत्येकवेळी आम्हाला राष्ट्रप्रेम सिद्ध करायला लावणे चुकीचे आहे. खरंतर आमचा संबंध मौलाना आझादांसारख्या नेत्यांशी का लावला जात नाही, असा आमचा सवाल आहे. देशातल्या चांगल्या नेत्यांशी आमचा कधी संबंध न जोडणे हा देखील बदनामीचाच एक भाग आहे, असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे.

भोंगे हटविण्याच्या मुद्दय़ानंतर मुस्लीम समाजातील भावना काय होत्या आणि त्याचा महापालिका निवडणुकीत किती परिणाम होईल? असाही सवाल जलील यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरेंनी औरंगाबादसारख्या शहरात १५ वर्षांपूर्वीं भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला असता तर तो पुरेसा ठरला असता पण आता परिस्थिती बदलली आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी येऊन दाखवा असे आव्हान देत आम्ही रस्त्यावर उतरलो असतो तर कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असती. पण आम्ही तसं काही होऊ दिलं नाही. हिंदू-मुस्लीम, भोंगे या प्रकरणाचा महापालिकांच्या निवडणुकीवरही परिणाम होणार नाही. कारण आता प्रचाराच्या शेवटच्या काळात हिंदू-मुस्लीम असा मुद्दा काम करणार नाही, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT