Minister Eknath Shinde
Minister Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

‘समृध्दी’च्या लोकार्पणाला धक्का! एकनाथ शिंदेंचा मुहूर्त हुकला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे (Samrudhi Mahamarg) काम वेगाने सुरू आहे. या महामार्गावरील नागपूर ते शेलू बाजार या टप्प्याचे लोकापर्ण येत्या दोन मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्याचे नियोजित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच ही घोषणा केली होती. पण आता त्यांचा हा मुहूर्त हुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कार्यक्रम दीड ते दोन महिने लांबणीवर पडला आहे.

महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्याआधी नागपूर ते शेलू बाजार या 210 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे राज्य सरकारने ठरवले होते. त्यानुसार सर्व तयारीही केली जात होती. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नुकताच संपूर्ण मार्गाची हवाई पाहणी केली. पण ठाकरे सरकारसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या या महामार्गाच्या पहिल्याच लोकार्पण कार्यक्रमात अडथळा आल्याने तो पुढे ढकलावा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. महामार्गाच्या पंधराव्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे काम प्रतगीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पध्दतीचे आहे. हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना 105 पैकी काही आर्च स्ट्रीप्सला अपघाताने हानी पोहचली आहे. तज्ज्ञासोबत पाहणी आणि चर्चा करून नवीन पध्दतीचे सुपर स्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे, असं महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाईल. या मार्गावरील सर्व महत्वाची शहरे आणि पर्यटन स्थळे जोडण्यासाठी आंतर-जोडणारे महामार्ग आणि फीडर रस्ते तयार केले जातील. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे आणखी चौदा जिल्हे जोडतील. या मार्गाने महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्हे जोडले जातील. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेसुद्धा द्रुतगती मार्गाशी जोडली जातील.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये –

- हा एक्सप्रेसवे 701 किमी लांबीचा असेल आणि थेट दहा जिल्हे, सव्वीस तालुके व आसपासच्या 392 गावांना जोडेल.

- याची गती मर्यादा 150 किमी आहे जी नागपूर व मुंबईला 8 तासांच्या आत पोहोचवेल. तर, मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर, आणखी 4 तास असेल.

- मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 8 लेन असतील. दोन्ही बाजूंनी लेन वाढवण्याची गरज भासल्यास एक्सप्रेस वेच्या मध्यभागी तरतूद केली गेली आहे. भविष्यात विस्तारीकरणासाठी यापुढे आणखी जमीन लागणार नाही.

- यास दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ते असतील जे अंडरपासवरून जोडले जातील.

- यात सुमारे 50+ उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 5 पेक्षा जास्त बोगद्या, 400+ वाहने आणि 300+ पादचारी मार्ग अंतर्गत मोक्याच्या ठिकाणी पुरविण्यात येतील.

- एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण लांबीमध्ये विस्तृत लँडस्केपींग, बोगद्याचे प्रकाश, पुल सुशोभिकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल संकेत वापरले जातील.

- एक्सप्रेस वे एक झीरो फॅटॅलिटी महामार्ग असेल; यामध्ये प्रत्येक 5 किमीवर सीसीटीव्ही पाळत ठेवणे व विनामूल्य टेलिफोन बूथ असतील - कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धसदृश परिस्थितीत द्रुतगती मार्गावर तात्पुरते धावपट्टीवर रूपांतर करून एक्सप्रेस वेवर विमान उतरवण्याची सुविधा प्रस्तावित केली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT