Bhai Jagtap
Bhai Jagtap Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi Sabha : पंचवीस वर्षे सोयरीक असलेल्या भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : भाई जगतापांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) गद्दारीनंतर काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आपल्यासोबत कायम असेल, अशी ग्वाही दिली होती. शिवसेनेने ज्यांच्याशी (भाजप) २५ वर्षे सोयरीक केली, त्या भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांची औलाद, अवकाद तीच आहे, त्यांचा इतिहास तोच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा इतिहास तो नाही. आम्ही ज्यावेळी खांद्याला खांदा देऊन काम करणार आहोत, असं सांगतो. शेवटपर्यंत म्हणजे भाजपला (BJP) तिकडं पोहोचवेपर्यंत एकत्र राहाणार आहोत, अशी ग्वाही काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. (It was BJP that stabbed Shiv Sena in the back: Bhai Jagtap)

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत झाली. त्या सभेत भाई जगताप बोलत होते. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे या सरकारला असंविधानिक बोलतात. पण मी त्यांना गद्दार म्हणतो. या पन्नास खोकेवाल्या सरकारने प्रयत्न करूनही संभाजीनगरमध्ये लोकांना थोपवू शकले नाहीत. नागपूरमध्ये त्यापेक्षा दोन पाऊले पुढे पडली होती. मुंबईतील सभेसाठी आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून बैठका घेत होतो, प्रयत्न करत होतो. आता मुंबईची सभा नागपूरच्या दोन पावले पुढे आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील, असे सांगितले असते तर कोणाचाही विश्वास बसला नसता. मात्र, शिवरायांचा महाराष्ट्र गीळकृंत करण्याचं पाप हे असंविधानिक सरकार करत आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी या राक्षसाच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, ही महाविकास आघाडी फुटकी तुटकी नाही, असेही जगताप म्हणाले.

सध्या सत्तेवर असलेल्या बोक्यांचे मुंबई महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवींवर लक्ष आहे. हे त्यांनी स्वतः बोलून दाखवले आहे. देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा या ठेवींचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. आपला दवाखान्याचा नुसता गाजावाजा केला जात आहे. ज्या वांद्रयातून बाबा सिद्धीकी निवडून यायचे, त्या भागातील दवाखान्यात एकही रुग्ण येत नाही. असेच २५ ते ३० दवाखाने मी पाहिले आहेत. या दवाखान्याची प्रसिद्धी मुंबई नगरसेवकांच्या फंडातून ४३ कोटींचा चुराडा केला आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही जगताप यांनी सुनावले.

महाविकास आघाडीत बिघाडी होत आहे, अशा पुड्या सोडल्या जात आहेत. मात्र, त्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या घटनेबाबत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कारण, मंत्री सगळे एसीत बसले होते, तर श्रीसेवक उन्हात बसले होते, त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही बिघाडीची कितीही स्वप्ने पाहिली तरी ती होणार नाही. आमचे नेते के. वेणुगोपाल हे मातोश्रीवर आले होते, त्यांनी एकत्र लढण्याची ग्वाही दिली.

मुंबईतून राक्षसाला पळवून लावण्यासाठी वाटेल ती करण्याची तयारी काँग्रेसची आहे. आम्हाला आमच्या पक्षाची ताकद वाढविण्याचा स्वार्थ आहे. पण नेते जो निर्णय घेतील, तो मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल, असेही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT