Rahul Narwekar and Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Narwekar : नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी; मुंबईनंतर आता पुण्यात भरवणार 'जनता न्यायालय' ?

Jui Jadhav

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची थेट चिरफाड करत व्हिडिओद्वारे पुरावेच दाखवले. मुंबईत घेतलेल्या या पत्रकार परिषदेची राज्यात मोठी चर्चा झाली.

या पत्रकार परिषदेला 'जनता न्यायालय' असं नाव देण्यात आलं होतं. हाच प्रयोग उद्धव ठाकरे आता पुण्यात राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाकडून पुण्यात देखील 'जनता न्यायालय' भरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं. तसेच 1999 साली निवडणूक आयोगात दाखल केलेली घटना वैध असल्याचं मान्य करत निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत ही शिवसेनेची खरी घटना ग्राह्य धरत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला हा निर्णय किती चुकीचा आहे, हे सांगण्यासाठी ठाकरेंनी 'जनता न्यायालय' भरवलं. या माध्यमातून नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची थेट चिरफाड करत 2013 आणि 2018 ला शिवसेनेच्या कार्यकारिणीचे थेट व्हिडिओद्वारे पुरावेच दाखवले. आता हाच प्रयोग पुन्हा एकदा पुण्यात राबवला जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला. तो निर्णय किती चुकीचा आहे, हे दाखवून देत ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर जोरदार टीका करण्यात आली. 2018 ची घटना अध्यक्षांनी अमान्य केली. पण यावरच जनता न्यायालयाच्या माध्यमातून महत्वाचे मुद्दे जनतेसमोर मांडत नार्वेकरांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगण्यात आले.

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनीही यावर भाष्य करत नार्वेकरांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगितलं. तसेच वकील रोहित शर्मा यांनीही शेड्युल 10 मध्ये न बसणारा निर्णय अध्यक्षांनी कसा दिला ? याबाबत सविस्तर माहिती सांगत अनेक सवाल उपस्थित केले. अनिल परब यांनी देखील त्यावेळी जे जाही घडलं ते विस्तृत सांगितलं.

पुण्यात होणार 'जनता न्यायालय'

मुंबईत (Mumbai) झालेल्या 'जनता न्यायालया'ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. आता पुन्हा एकदा असंच 'जनता न्यायालय' पुण्यात भरवलं जाणार असल्याची माहिती आहे. पुण्यात 'जनता न्यायालय' घेण्याचा पुणेकरांचा आग्रह असल्याने हे 'जनता न्यायालय' पुण्यात घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हे न्यायालय भरवण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

'जनता न्यायालया'चे पडसाद

ठाकरे गटाच्यावतीने मुंबईत 'जनता न्यायालय' घेण्यात आलं. या माध्यमातून ठाकरे गटावर नार्वेकरांनी कसा अन्याय केला हे सांगण्यात आलं. यानंतर मात्र दोनच दिवसांत याचे पडसाद दिसून आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तसेच आमदार राजन साळवी यांचीही चौकशी एसीबीकडून करण्यात आली. जनता न्यायालय घेण्यात आल्यानंतर या कारवाया सुरु झाल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पुण्यात मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

(Edited by: Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT