Jasmin Wankhede and Nawab Malik
Jasmin Wankhede and Nawab Malik Sarkarnama
मुंबई

ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? जास्मिन वानखेडेंचा मलिकांवर पलटवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांना जास्मिन वानखेडे (Jasmin Wankhede) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक यांनी वानखेडे यांचे मालदीव येथील काही फोटो शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. मालदीव व दुबईमध्येच सर्व तडजोडी झाल्याचा संशय आहे, असं मलिक म्हणाले. वानखेडे यांनी ऑस्ट्रेलियाचा उल्लेख करत मलिकांवर पलटवार केला आहे.

मलिकांच्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. जास्मिन यांच्यासह अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) व सचिव शर्मिला ठाकरे (sharmila Thackeray) यांनी मलिकांवर निशाणा साधला. जास्मिन म्हणाल्या, तुम्ही ज्या पदावर आहे, त्या पदाला हे वागणं शोभत नाही. महिलांचा आदर करायला हवा. कमरेखालचे आरोप करू नयेत. एक प्रामाणिक अधिकारी ड्रग्जच्या केसमध्ये कारवाई करत आहे, म्हणून हे घडत आहे.

लोकांनी त्यांना सहकार्य करायला हवं. मी एक वकील आहे, माझ्याविषयीच असं बोललं जात आहे. तुम्हाला बांगड्या पाठवू का. समाजासाठी काहीतरी चांगलं करा. महिलांसाठी चांगलं करा. तुम्ही अण्णा हजारेंनाही सोडलं नाही, मी तर सामान्य माणूस आहे. मी असं काय करते 'डॉन' बोलायला. आधी तुम्ही पुरावे आणा आणि मग बोला. मी मालदीवला कधी गेले, समीर वानखेडे सोबत होते की नाही. हे त्यांना कसं माहिती झालं. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे, अशी टीका जास्मिन यांनी केली आहे.

आम्ही ऑस्ट्रेलियाविषयी काही बोललो का, असा सवाल करत जास्मिन यांनी मलिकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियामध्ये नेमकं काय घडलं, याविषयी मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला. मी नबाव मलिक नाही, त्या पातळीवर जाऊ शकत नाही. याबाबत त्यांना तुम्हीच विचारावं. मी याबाबत नंतर खुलासा करीन. मलिकांनी पुरावे असल्याशिवाय बोलू नये. त्यांच्या चांगले समुपदेशक व सल्लागारांची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. कायदेशीर कारवाई करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, कोविड काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. तर स्वत: वानखेडे दुबईत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणण्यात आलं. आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात आलं. पण ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा झालाच नाही. उलट सिनेसृष्टीत एनसीबीचा खेळ सुरू झाला, असं मलिक म्हणाले.

रिया चक्रवर्तीला अडकवण्यात आलं. चार-चार हजार रुपयांच्या पेमेंटवर गुन्हे दाखल झाले. अभिनेत्री, अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभं केलं गेलं, असं सांगत मलिक यांनी ही सर्व वसुली मालदीव मध्ये झाल्याचा धक्कादायक आरोप केला. कोविड काळात सिनेसृष्टी मालदीवमध्ये होती. अधिकाऱ्याच्या परिवातील लोक मालदीवमध्ये तर स्वत: अधिकारी दुबईत होते. याचा खुलासा त्यांना करावा लागेल. त्यांनी सांगावं, ते दुबईत गेले होते की नाही. त्यांचे कुटूंबातील लोक मालदीवमध्ये होते की नाही. मालदीव व दुबईमध्येच सर्व तडजोडी झाल्याचा संशय आहे, असं मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT