Jitendra Awhad-Ashok Gawde
Jitendra Awhad-Ashok Gawde Sarkarnama
मुंबई

जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भरसभेत केली कानउघडणी!

सरकारनामा ब्यूरो

वाशी : ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्‌घाटन पत्रिकेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांचे साधे नावदेखील नाही. मी ठाणे जिल्ह्यातील मंत्री असून माझेही नाव वगळले, याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला. तुम्ही झोपले होतात काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची भरसभेत कानउघडणी केली. (Jitendra Awhad asked questions to NCP's Navi Mumbai district president)

नवी मुंबईतील ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्‌घाटन सोहळ्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रित केले नव्हते. त्या बाबत शिवसेनेचे नेते, तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जाब विचारणार असल्याचेही गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ऐरोलीच्या वाशी येथील लक्ष्मीनारायण सभागृहात करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून गृहनिर्माण मंत्री आव्हाड उपस्थित होते.

याच मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांना भरमेळाव्यात सुनावले. ऐरोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्‌घाटन पत्रिकेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे नाहीत. तसेच ठाणे जिल्ह्यातील मी मंत्री असून माझेही नाव वगळले, याबाबत तुम्ही आयुक्तांना याचा जाब का विचारला नाही. याविरोधात आंदोलन का केले नाही, असा प्रश्‍नही आव्हाडांनी गावडे यांना केला.

दरम्यान, शिवसेनेच्या या वागणुकीबद्दल जितेंद्र आव्हाडांनी नाराजीही व्यक्त केली. ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे राज्यात सरकार आहे. पण, नवी मुंबईत राष्ट्रवादीला विश्वासात न घेता विकासकामांचे श्रेय शिवसेना घेत आहे. शिवसेना असेच वागणार असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही आव्हाडांनी या वेळी बोलताना दिला.

शिवसेना अशा पद्धतीने वागून भाजपला सत्तेची दार स्वत: खुले करून देत आहे, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला. महाविकास आघाडीसाठी आपण प्रयत्न केले; परंतु सध्या शिवसेनेतील नेते राष्ट्रवादीला विचारात घेत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेने वेळीच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करीत आव्हाड यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT