Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाण्यात आज टोळीयुद्ध उद्या तुमच्या अंगावर येतील; जितेंद्र आव्हाडांचा रोख कुणाकडे?

Pankaj Rodekar

Thane Political News : महायतुतीत नाशिक, ठाणे, पालघरचा तिढा सुटला आहे. नाशिक आणि ठाणे शिवसेना शिंदे गटाकडे तर पालघर भाजपकडे गेले आहे. ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मात्र दोन गटात वादाची घटना घडली. यावरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत सापडले आहे.

ठाण्यात घडलेल्या हाणामारीच्या प्रकारावरून इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी सत्ताधारी पक्षांसह नेत्यांचा सडकून समाचार घेतला आहे. ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता, त्यांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडवले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे म्हणत आव्हाडांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के Naresh Mhaske हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जात होते. त्यावेळी त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळीयुद्ध झाले. याबाबत जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर पोस्ट करून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. ते म्हणाले, आपण जे पेरतो, तेच उगवत असते. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात होते, त्यावेळी राजाश्रय असलेल्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात; तेथेच त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराच्या मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे, असेही आव्हाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्रात Maharashtra ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलिस त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असेल त्याला तडीपार करण्याची ऑर्डर काढणार्‍या पोलिसांचे मला कौतुक वाटते. ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले, त्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणूकाही ते प्रशासनाचे जावई आहेत. म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठे करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT